Swami Amazing
Friday, April 3, 2026
येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती
येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती
येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती
📍 अकोले, ता. १८ : अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाई देवी यात्रेत यंदा लाखो भिल्ल समाज बांधवांनी उपस्थिती लावत श्रद्धेचा जल्लोष केला. चैत्र पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या तीन दिवसीय यात्रेत नवसपूर्तीसाठी हजारो बोकड व कोंबड्यांची आहुती देण्यात आली.
भिल्ल समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या येडूबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अंगावर असूड मारत, कापूर जाळत, लोटांगण घालत भाविकांनी गडावर जात देवीचा जयजयकार केला.
यात्रेची सुरुवात पहाटे अभिषेकाने होत असून त्यानंतर देवीला पारंपरिक पोशाख चढविण्यात येतो. दुपारी गोंधळ, आरती व भजन कार्यक्रम पार पडतात. सायंकाळी ‘छबिना’ मिरवणूक काढण्यात येते. डफ, हलगीच्या निनादात काठ्या नाचवत मिरवणूक गावातून गडावर पोहोचते.
छबिना मंदिरात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत वाघाई व गाडीवान देवतांसमोर नवसपूर्तीसाठी बोकड व कोंबड्यांची आहुती दिली जाते. त्यानंतर परिसरात सामूहिक स्वयंपाक व भोजनाचा कार्यक्रम रंगतो.
यात्रेदरम्यान भिल्ल समाजातील बांधव काही दिवस मुक्काम करत परस्पर संवाद, नातेसंबंध व सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. त्यामुळे हा उत्सव सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरतो.
दरम्यान, गड परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी होत आहे. तर प्राण्यांच्या आहुतीला पर्याय शोधावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असली तरी ही परंपरा कायम ठेवण्याचा भिल्ल समाजाचा ठाम पवित्रा आहे.
Tuesday, March 31, 2026
Sakal
https://news2.sakaalmedia.com/SmartBureauapi/ereporterapp
Monday, March 16, 2026
Monday, March 9, 2026
*पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते ऋणानुबंधचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण संपन्न*
https://godatirnews.com/runanubandh-purskar-2025/
Thursday, February 26, 2026
लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा...
लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा...
परंपरेने चालत आलेल्या व अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेल्या अनेक चांगल्या रीतीरिवाज, पध्दतींचे विकृतीकरण झाले की त्याचे काय होते याचा अनुभव आपण आताच्या लग्न समारंभातील अनेक पध्दतीमध्ये घेत आहोत.
मूळ तो रिवाज का सुरू झाला, त्यामागील भावना, पावित्र्य काय होते याचा विचार न करताच त्याचे अवडंबर माजवण्याची वाईट स्पर्धा समाजाला लागली आहे. त्यात तुम्ही हे करताय ते चुकीचे आहे असे त्यांना कोण सांगतही नाही आणि ते चुकीचे आहे असेही समाजाला वाटत नाही. तसे वाटत असते तर अशा काही पध्दती कमी किंवा बंद झाल्या असत्या. प्रत्यक्षात तसे न होता त्या अधिक भडकपणे साजऱ्या करून आनंद मिळवण्याची समाजात जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येकजण जे सुरू आहे त्याच्या पुढे एक पाऊल टाकत आहे.
हल्ली लग्न, गावातील असो की शहरातील. हळदी लावण्याच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम आणि मद्यपान करून धिंगाणा हे सुत्रच घट्टच झाले आहे. या शॉवरसाठी किमान तीन हजारांपासून पैसे मोजायला लागतात. त्याशिवाय हळद लावणारे पाहुणे किती आहेत त्यावर पाच किंवा दहा हजार लिटर पाण्याची व्यवस्था करावी लागते. पाण्याची नासाडीचा विचार करणाऱ्याला खुळ्यातच काढले जाते. पोरांच्या हौसेपुढे असल्या फालतू गोष्टींचा विचार करणारा मागासलेल्या मनोवृत्तीचा किंवा मुलांचा चांगलं बघवत नाही असा ठरतो.
लग्नाच्या आदल्या दिवशी किमान तीन तास हा धिंगाणा सुरू असतो. त्यात हळद वाटीभरच असते आणि उधळली जाते ती पिवडीच असते. ती लावल्याने नव्हे अंगावर ओतल्याने केस आणि चेहराही विद्रूप होऊन जातो. डोळे चरचरतात. एका अर्थाने आपल्या लग्नसमारंभातील एका चांगल्या रिवाजाचेच समाजाने केलेले हे विद्रूपीकरण आहे.
मुळात नवरा-नवरीला हळद लावण्यामागील भावना आरोग्याशी जोडलेली आहे. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरापासून आपल्या सर्वच धार्मिक कार्यात केला गेला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ती जंतुनाशक आहे. म्हणूनच ती लग्नापूर्वी लावली जाते. त्यामागेही दोन कारणे आहेत. दोन भिन्न कुटुंबातील व्यक्ती एकत्र येताना त्यांना परस्परांपासून कोणताच संसर्ग होऊ नये हा त्यातील मुख्य गाभा. त्यांची सुरक्षितता म्हणून हळद लावायची. दुसरे असे की आपल्या संस्कृतीनेच असे रिवाज आपल्या सामाजिक जीवनात पेरले आहेत की त्यातून नात्याची वीण अधिकाधिक घट्ट व्हावी.
पूर्वी हळद लावण्यापूर्वी हळद दळण्याचा कार्यक्रम होत असे. भल्या मोठ्या लाकडी जात्यात ती हळकुंडे दळायची. त्याला साऱ्या भावकीला बोलवले जाई. दळलेली हळद अगोदर ज्यांच्या नावचे देवक आहे त्यांना लावली जाई. मग ती नवऱ्याला लावायची. त्यासाठी भिजवलेली उष्टी हळद नवरीच्या गावाला वाटीतून पाठवून दिली जाई. ही हळद आल्याशिवाय नवरीला परस्पर हळद लावली जात नसे. आपल्या ताटातले अर्धे होणाऱ्या पत्नीसाठी काढून देण्याची भावना म्हणजे तिला मनापासून स्वीकारले हा कृतीतून दिलेला विश्वास असे. दोघांना एकत्र आणणारा हा एक संस्कारच आहे.
अक्षतापूर्वी नवऱ्यास बैलगाडी, सायकल, घोडा, किंवा मोटारीतून श्रीबंधनाला नेले जाते. मुख्यत: ग्रामदैवताला जाऊन नमस्कार केला जातो. नवीन आयुष्याची (मुख्यत: प्रजननास परवानगी) सुरुवात करताना गावपांढरीची सावली आपल्यावर असावी असा त्यामागे हेतू. देवाची परवानगी घेण्याची प्रथा. अशा अनेक प्रथा-परंपरा, रिवाज समाजव्यवस्थेने नातेसंबंध अधिक घट्ट व्हावेत या हेतूने सुरू केल्या. त्यातला गाभा हरवला आणि उत्सवीकरणाला महत्त्व आले आहे..
Tuesday, February 24, 2026
माणसाला माणुसकीची ओळख करून देणारी माऊली संस्था आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे
माणसाला माणुसकीची ओळख करून देणारी माऊली संस्था
आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे यांच्या कार्याला भेटीतून सलाम
अकोले प्रतिनिधी : समाजाने विस्मृतीत टाकलेल्या मनोरुग्ण व निराधार महिलांना माणुसकीचा आधार देत त्यांना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे यांच्या माऊली संस्थेला भेट देण्याचा योग लाभणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. श्रावण आणि त्यांच्या मातोश्रींची भेट हे या भेटीचे औचित्य होते.
आजच्या धावपळीच्या आणि स्वकेंद्रित जीवनशैलीत एक दांपत्य झपाटल्यासारखे कार्य करत सुमारे साडेचारशे मनोरुग्ण महिला व पन्नासहून अधिक लहान मुलांचे आई-वडील बनले आहे. समाजभान हरवलेल्या महिलांना पुन्हा समाजात उभे करण्याचे माणुसकीचे दर्शन माऊली संस्थेत अनुभवायला मिळाले.
संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास धामणे दांपत्यांनी सांगताना अनेक हृदयस्पर्शी अनुभव समोर आले. संस्थेत दाखल झालेल्या महिलांमध्ये वकील, डॉक्टर, एम.फिल. पदवीधर, शिक्षिका, कवयित्री अशा उच्चशिक्षित महिलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आजारामुळे भरकटलेल्या या महिलांना संस्थेने सुरक्षित आश्रय, सन्मान आणि स्वतःचे घर दिले आहे.
माऊली संस्था व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरत आहे. येथे प्रत्येक महिला स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते. काही महिला स्वयंपाकगृह, काही बेकरी, काही बाग-बगीचा तर काही गोशाळेची जबाबदारी सांभाळतात. श्रमातून स्वाभिमान आणि कामातून आत्मविश्वास निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे.
संस्थेत सर्वांना समान वागणूक दिली जाते. मोठा-लहान असा भेदभाव नाही. महिलांना नियमित औषधोपचार वेळेवर दिले जातात. स्वावलंबनाकडे वाटचाल करत संस्था आता स्वयंपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असून येथे वाढणारी मुलेही सक्षम भविष्य घडविण्यास सज्ज होत आहेत.
जगाची ‘माऊली’ म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख केला जातो; त्याचप्रमाणे माऊली संस्था आज अनेक मनोरुग्ण महिला व त्यांच्या मुलांची खरी माऊली ठरत आहे. संस्थेतील कार्य पाहिल्यानंतर मन नतमस्तक होते आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीव होते.
Subscribe to:
Comments (Atom)

















