Monday, April 27, 2026

समाजभान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

समाजभान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पित नेतृत्व यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. आपल्या कार्यातून त्यांनी केवळ वैयक्तिक ओळख निर्माण केली नाही, तर समाजजीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. पत्रकार म्हणून शांताराम काळे यांनी ग्रामीण भागातील समस्या, विकासकामांतील अडथळे, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक घडामोडी प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या. वस्तुनिष्ठता, निर्भीडपणा आणि जनसामान्यांच्या हितासाठी ठाम भूमिका घेणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्हता संपादन केली आहे. ग्रामीण पत्रकारितेला जबाबदारीची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचे कार्य केवळ बातम्यांपुरते मर्यादित राहिले नाही. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, विविध जनहिताच्या उपक्रमांना चालना देणे आणि युवकांना विधायक मार्ग दाखविणे हे कार्य सातत्याने केले. समाजाशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख दृढ झाली आहे. स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्यांची जोड मिळावी, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. शिक्षण हीच ग्रामीण विकासाची खरी गुरुकिल्ली आहे, या विश्वासातून त्यांनी काम पुढे नेले. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली, पालकांचा विश्वास दृढ झाला आणि विद्यार्थ्यांसाठी नवी संधी निर्माण झाली. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत समतोल साधत समाजासाठी कार्य करणारे शांताराम काळे हे निश्चितच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. आजच्या काळात समाजासाठी नि:स्वार्थीपणे काम करणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. अशा वेळी शांताराम काळे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे आशेचा किरण ठरतात. समाजहिताचा ध्यास घेऊन काम करणाऱ्यांचा सन्मान होणे, हीच खरी समाजाची प्रगती ठरेल.

Friday, April 3, 2026

Photo

येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती

येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती 📍 अकोले, ता. १८ : अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाई देवी यात्रेत यंदा लाखो भिल्ल समाज बांधवांनी उपस्थिती लावत श्रद्धेचा जल्लोष केला. चैत्र पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या तीन दिवसीय यात्रेत नवसपूर्तीसाठी हजारो बोकड व कोंबड्यांची आहुती देण्यात आली. भिल्ल समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या येडूबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अंगावर असूड मारत, कापूर जाळत, लोटांगण घालत भाविकांनी गडावर जात देवीचा जयजयकार केला. यात्रेची सुरुवात पहाटे अभिषेकाने होत असून त्यानंतर देवीला पारंपरिक पोशाख चढविण्यात येतो. दुपारी गोंधळ, आरती व भजन कार्यक्रम पार पडतात. सायंकाळी ‘छबिना’ मिरवणूक काढण्यात येते. डफ, हलगीच्या निनादात काठ्या नाचवत मिरवणूक गावातून गडावर पोहोचते. छबिना मंदिरात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत वाघाई व गाडीवान देवतांसमोर नवसपूर्तीसाठी बोकड व कोंबड्यांची आहुती दिली जाते. त्यानंतर परिसरात सामूहिक स्वयंपाक व भोजनाचा कार्यक्रम रंगतो. यात्रेदरम्यान भिल्ल समाजातील बांधव काही दिवस मुक्काम करत परस्पर संवाद, नातेसंबंध व सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. त्यामुळे हा उत्सव सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरतो. दरम्यान, गड परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी होत आहे. तर प्राण्यांच्या आहुतीला पर्याय शोधावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असली तरी ही परंपरा कायम ठेवण्याचा भिल्ल समाजाचा ठाम पवित्रा आहे.

Tuesday, March 31, 2026

Sakal

https://news2.sakaalmedia.com/SmartBureauapi/ereporterapp

Monday, March 9, 2026

*पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते ऋणानुबंधचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण संपन्न* https://godatirnews.com/runanubandh-purskar-2025/

Thursday, February 26, 2026

लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा...

लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा... परंपरेने चालत आलेल्या व अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेल्या अनेक चांगल्या रीतीरिवाज, पध्दतींचे विकृतीकरण झाले की त्याचे काय होते याचा अनुभव आपण आताच्या लग्न समारंभातील अनेक पध्दतीमध्ये घेत आहोत. मूळ तो रिवाज का सुरू झाला, त्यामागील भावना, पावित्र्य काय होते याचा विचार न करताच त्याचे अवडंबर माजवण्याची वाईट स्पर्धा समाजाला लागली आहे. त्यात तुम्ही हे करताय ते चुकीचे आहे असे त्यांना कोण सांगतही नाही आणि ते चुकीचे आहे असेही समाजाला वाटत नाही. तसे वाटत असते तर अशा काही पध्दती कमी किंवा बंद झाल्या असत्या. प्रत्यक्षात तसे न होता त्या अधिक भडकपणे साजऱ्या करून आनंद मिळवण्याची समाजात जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येकजण जे सुरू आहे त्याच्या पुढे एक पाऊल टाकत आहे. हल्ली लग्न, गावातील असो की शहरातील. हळदी लावण्याच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम आणि मद्यपान करून धिंगाणा हे सुत्रच घट्टच झाले आहे. या शॉवरसाठी किमान तीन हजारांपासून पैसे मोजायला लागतात. त्याशिवाय हळद लावणारे पाहुणे किती आहेत त्यावर पाच किंवा दहा हजार लिटर पाण्याची व्यवस्था करावी लागते. पाण्याची नासाडीचा विचार करणाऱ्याला खुळ्यातच काढले जाते. पोरांच्या हौसेपुढे असल्या फालतू गोष्टींचा विचार करणारा मागासलेल्या मनोवृत्तीचा किंवा मुलांचा चांगलं बघवत नाही असा ठरतो. लग्नाच्या आदल्या दिवशी किमान तीन तास हा धिंगाणा सुरू असतो. त्यात हळद वाटीभरच असते आणि उधळली जाते ती पिवडीच असते. ती लावल्याने नव्हे अंगावर ओतल्याने केस आणि चेहराही विद्रूप होऊन जातो. डोळे चरचरतात. एका अर्थाने आपल्या लग्नसमारंभातील एका चांगल्या रिवाजाचेच समाजाने केलेले हे विद्रूपीकरण आहे. मुळात नवरा-नवरीला हळद लावण्यामागील भावना आरोग्याशी जोडलेली आहे. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरापासून आपल्या सर्वच धार्मिक कार्यात केला गेला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ती जंतुनाशक आहे. म्हणूनच ती लग्नापूर्वी लावली जाते. त्यामागेही दोन कारणे आहेत. दोन भिन्न कुटुंबातील व्यक्ती एकत्र येताना त्यांना परस्परांपासून कोणताच संसर्ग होऊ नये हा त्यातील मुख्य गाभा. त्यांची सुरक्षितता म्हणून हळद लावायची. दुसरे असे की आपल्या संस्कृतीनेच असे रिवाज आपल्या सामाजिक जीवनात पेरले आहेत की त्यातून नात्याची वीण अधिकाधिक घट्ट व्हावी. पूर्वी हळद लावण्यापूर्वी हळद दळण्याचा कार्यक्रम होत असे. भल्या मोठ्या लाकडी जात्यात ती हळकुंडे दळायची. त्याला साऱ्या भावकीला बोलवले जाई. दळलेली हळद अगोदर ज्यांच्या नावचे देवक आहे त्यांना लावली जाई. मग ती नवऱ्याला लावायची. त्यासाठी भिजवलेली उष्टी हळद नवरीच्या गावाला वाटीतून पाठवून दिली जाई. ही हळद आल्याशिवाय नवरीला परस्पर हळद लावली जात नसे. आपल्या ताटातले अर्धे होणाऱ्या पत्नीसाठी काढून देण्याची भावना म्हणजे तिला मनापासून स्वीकारले हा कृतीतून दिलेला विश्वास असे. दोघांना एकत्र आणणारा हा एक संस्कारच आहे. अक्षतापूर्वी नवऱ्यास बैलगाडी, सायकल, घोडा, किंवा मोटारीतून श्रीबंधनाला नेले जाते. मुख्यत: ग्रामदैवताला जाऊन नमस्कार केला जातो. नवीन आयुष्याची (मुख्यत: प्रजननास परवानगी) सुरुवात करताना गावपांढरीची सावली आपल्यावर असावी असा त्यामागे हेतू. देवाची परवानगी घेण्याची प्रथा. अशा अनेक प्रथा-परंपरा, रिवाज समाजव्यवस्थेने नातेसंबंध अधिक घट्ट व्हावेत या हेतूने सुरू केल्या. त्यातला गाभा हरवला आणि उत्सवीकरणाला महत्त्व आले आहे..