Wednesday, June 15, 2022

गाथा विकासाची, द्रष्टया नेतृत्वाच्या कर्तृत्वाची

गाथा विकासाची, द्रष्टया नेतृत्वाच्या कर्तृत्वाची

अकोले :- 

समृध्द वैभवशाली निसर्ग आणि उपेक्षित माणसे हे अकोले तालुक्याचे पूर्वापार दिसणारे चित्र. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा हे येथील बहुसंख्य माणसांचे एकेकाळचे दुर्भाग्य होते. मात्र गेल्या अडीच तीन तपांच्या कालावधीत यात बदल होत गेला आहे. 1980 सालचा अकोले तालुका 2022 साली राहिलेला नाही. उपेक्षितपणाचा काळोख सरला आहे. समृध्द आणि वैभवशाली प्रकाशाची आस तालुक्याला लागली आहे.

अकोले बदलत आहे..

एकेकाळी भात, बाजरी सारखी पिके घेणारा आणि पावसावर पूर्णपणे अवलंबून असणारा येथील शेतकरी आता  तंत्रज्ञानाची कास धरीत शेतीत विविध प्रयोग,विविध विक्रम करीत आहे. येथील शेतकर्‍याने पिकवलेली द्राक्षे आणि डाळींबे परदेशात जात आहेत. डॉक्टर, इंजिनिअर होणे अथवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी होणे येथील तरुणांना आता नविन राहिलेले नाही. एवढेच नाही तर उच्च शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी अथवा ऑस्टे्रलियासारखे देश जवळ करणारया तरुणांची संख्या वाढत आहे. उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या येथील भूमिपूत्रांची आणि त्यांच्या हॉस्पिटलची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यातील पतसंस्था आणि विविध बँकेच्या शाखांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा होत आहेत. पूर्वी तालुक्यातील अनेक गावांचा पावसाळ्यात तालुक्याशी संपर्क तुटायचा, अनेक गावे दूर्गम होती. मात्र आता वाडी, वस्तीपर्यंत पोहचलेल्या डांबरी सडकांमुळे बाराही महिने तालुक्यातील कोणत्याही गावात, कोणत्याही ऋतुत सहजपणे पोहचता येते. अकोले शहरही गेल्या काही वर्षात बदलले आहे. शहरात उभ्या राहत असणार्‍या आधुनिक इमारती,गावाच्या सभोवताली झालेले लहानमोठे बंगले, विविध वस्तुंचे मॉल्स, लहानमोठी दुकाने, जिभेचे चोचले पुरविणारी विविध प्रकारची हॉटेल्स, सोन्या चांदीची दुकाने (अन दारुचीही) यांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यातील लहानमोठी गावेही कात टाकत आहेत.येथील माणसांची बदलत्या काळानुसार बदलण्याची वृत्ती, नवे काही शिकण्याची उमेद, संघर्षशील पण विकासात्मक दृष्टीकोन, जिद्द, चिकाटी याला या बदलाचे श्रेय असले तरी तालुक्याला लाभलेल्या विकासाभिमुख नेतृत्वाचाही यात मोठा वाटा आहे. 1980 साली मधुकरराव पिचड अकोले तालुक्याचे आमदार झाले. त्यानंतर सलग सात निवडणूका त्यांनी जिंकल्या. राज्य मंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेता, राज्यातील सत्तारुढ पक्षाचा अध्यक्ष अशी सत्तेच्या राजकारणातील विविध पदे त्यांनी भुषविली. आपल्या लोकप्रतिनिधीच्या या कार्यकाळात त्यांनी तालुक्यात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यात मुलभूत स्वरुपाचे जे काम केले त्यामुळे अकोले तालुक्याच्या विकासाला आणि अर्थकारणाला गती प्राप्त झाली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या या पायाभूत सुविधांची फळे आज तालुका चाखत आहे.त्यांनी तीस पस्तीस वर्षात तालुक्यात केलेल्या मूलभूत स्वरूपाच्या कामांवरच येथील विकासाची इमारत उभी आहे.

पाणीदार आमदार..

मधुकरराव पिचड म्हणजे संघर्षातून पुढे आलेले, सतत धढपडणारे, विकासाचा ध्यास घेतलेले, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी झगडणारे आणि वंचित घटकांबद्दल आस्था बाळगणारे एक संघर्षशील नेतृत्व होय. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना आपल्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जी विविध पदे भुषविली आणि राज्याच्या राजकारणात आपली जी ओळख निर्माण केली असे भाग्य क्वचितच कोणाच्या वाट्याला आले असेल. तालुक्यातील जनतेशी जुळलेली नाळ आणि राजकीय फायद्यातोट्याचा विचार न करता जनतेच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी घेतलेली लढाऊ भूमिका ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची  वैशिष्ठ्ये होत. 

आमदार झाल्यानंतर अल्पकाळातच ‘पाणीदार आमदार’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्याला निमित्त ठरले भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाचे आंदोलन. भंडारदरा धरण अकोले तालुक्यात असले तरी प्रवरा नदीच्या पाण्यावर तालुक्यातील जनतेचा कायदेशीर हक्क नव्हता. वाहणारे पाणी पाहणे प्रवरा खोर्‍यातील जनतेच्या नशिबी होते. मागील शतकातील 70 च्या दशकात अकोले तालुक्यात वीज आली  नंतर पीव्हीसी पाईपमुळे उपसा जलसिंचन योजनांचे तंत्र सुलभ झाले. बँका, साखर कारखान्यांनी सिंचन योजनांसाठी अर्थपुरवठा द्यायला सुरुवात केली त्यामुळे प्रवरा नदीवर अनेक ठिकाणी लहानमोठ्या उपसा जलसिंचन योजना उभ्या राहू लागल्या. मात्र वर्षानुवर्षे भंडारदर्‍याचे पाणी वापरणार्‍या प्रस्थापितांना हे सहन झाले नाही, त्यातूनच या उपसा जलसिंचन योजनांना बेकायदेशीर ठरवत अनेक योजनांची वीज तोडण्यात आली. त्यामुळे प्रवरा खोर्‍यात मोठा असंतोष निर्माण झाला.त्यातूनच प्रवरेच्या पाण्याच्या न्याय हक्कासाठी अकोले तालुक्यात मोठा संघर्ष उभा राहिला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाण्याच्या न्याय हक्कासाठी चळवळ सुरु केली. सत्तारुढ पक्षाचे आमदार असतानाही स्वत:च्या सरकारशी संघर्ष करण्याचे धाडस दाखवत श्री.पिचड या आंदोलनात सहभागी झाले. भंडारदर्‍याचे चाक बंद करण्याचे आंदोलनात ते अग्रभागी होते. त्यांच्यासह अनेक आंदोलकांवर खटले दाखल झाले. पुढे जनतेच्या रेट्यापुढे सरकारला भंडारदर्‍याच्या पाण्याचे फेरवाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले. मंत्रीमंडळात असणार्‍या श्री.पिचड यांचा या सर्व घडामोडीत महत्वाचा वाटा होता. तेव्हापासून पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख निर्माण झाली.


पाणी अडविण्याचा धडक कार्यक्रम..

प्रवरेच्या पाण्यात हक्क मिळाल्यामुळे प्रवरा खोर्‍यात, शेतशिवारात दूरपर्यंत प्रवरेेचे पाणी फिरले, शेती फुलली. मात्र अकोले तालुक्यातील मुळा खोरे तसेच आढळा पाणलोट क्षेत्र  पाण्यापासूनच वंचित होते.पावसाळा संपताच या नद्या महिनाभरात कोरड्या पडत. तालुक्यातील शेतकर्‍याच्या शेताला पाणी मिळावे यासाठी पाणी अडविण्याचा धडक कार्यक्रम त्यांचे कार्यकाळात राबविला गेला. पाझर तलाव,साठवण तलाव,बंधारे,सिमेंट बंधारे,वनबंधारे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे यांची शेकडो कामे तालुक्यात झाली. मात्र या प्रकारे पाणी अडण्यास मर्यादा असल्यामुळे मुळा तसेच आढळा खोऱ्यात लघुपाटबंधारे प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले.  येथेही  प्रस्थापित आडवे आले. नद्यांच्या खोर्‍यात वर पाणी अडले तर आपल्याला पाणी कमी पडेल अशी भिती खालच्या भागातील पुढार्‍यांना वाटू लागली. अकोले तालुका गोदावरी खोर्‍यात येत असल्यामुळे "वॉटर अकाउंट" चे अडथळे उभे करण्यात आले. मात्र तेव्हा सत्तेत असणार्‍या पिचड यांचेमुळे टिटवी, पाडोशी, कोथळे,अंबित, देवहंडी,बलठन यासारख्या प्रकल्पांना विशेष बाब म्हणून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळू शकले. अन्यथा हे प्रकल्प कधीच होऊ शकले नसते. काही प्रकल्पातील वनखात्याचे अडथळेही त्यांच्या मुळे दूर झाले. पाणी अडविण्याच्या या कार्यक्रमात मुळा नदीवर शिसवद पासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागापर्यंत कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांची साखळी निर्माण झाली.आढळा नदिवरही अशीच बंधाऱ्यांची साखळी उभी राहिली. मुळा खोर्‍यात  आठ तर इतरत्र सात अशी पंधरा छोटी धरणे त्यांचे कार्यकाळात तयार झाली.  वाकी, सांगवी किंवा कोथळे सारखे प्रकल्प अवघ्या वर्षभरात पूर्ण झाले. मुळा बारमाही करण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न कोल्हापूर बंधार्‍यांची साखळी आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यामुळे अंशत: पूर्ण झाले. पावसाचे कमी प्रमाण असणाऱ्या आढळा खोऱ्यात बिताक्याच्या घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी वळण बंधाऱयाद्वारे वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला.त्या मुळे आढळा धरणासाठी पाण्याची उपलब्धता वाढली.


विजेचे जाळे..

मोठ्या प्रमाणात पाणी अडल्यामुळे ठिकठिकाणची शेती फुलू लागली. शेतकर्‍यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होऊ लागला.

तालुक्यात विविध प्रकल्पाद्वारे पाणी उपलब्ध झाल्यानंतर ठिकठिकाणी विहीरी खोदण्यात आल्या. ओढ्यांवर, नद्यांवर शेतकर्‍यांनी वैयक्तिक, सामुदायिक स्वरुपात उपसा जलसिंचन योजना केल्या. नदीच्या दूतर्फा दुरवरपर्यंत पाणी पोहचले. एकेकाळचे ओसाड, उजाड माळराने हिरवीगार झाली मात्र या सर्वांसाठी वीजेची गरज होती. 1966 साली अकोले तालुक्यात शेकेईवाडी येथील एका विहीरीवर पहिला वीज पंप बसविण्यात आला, त्यावेळेला तालुक्यात असणार्‍या विहीरींची संख्या ही मर्यादीतच होती. अनेक ठिकाणी मोटांचा तर काही ठिकाणी डिझेल इंजिनचा मोटा बसविण्यासाठी वापर होत होता. मात्र 90 च्या दशकानंतर शेतीसाठी पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि वीजेच्या मागणीत वाढ होऊ लागली. वीजेच्या मागणीतील वाढ लक्षात घेऊन श्री.पिचड यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणाचा व्यापक कार्यक्रम तालुक्यात हाती घेण्यात आला. गरजेनुसार वीज उपकेंद्रांची संख्या वाढवत नेण्यात आली. 50 वर्षापुर्वी अकोेले तालुक्यात केवळ अकोले येथेच वीज उपकेंद्र होते आणि तालुक्याच्या काही भागाला संगमनेर तालुक्यातील वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा होत होता मात्र आज अकोले तालुक्यात 132 केव्ही क्षमतेची अकोले आणि भोजदरी अशी दोन वीज उपकेंद्रे आहेत तर 33 केव्ही क्षमतेची डझन भरपेक्षा वीज उपकेंद्रे आहेत. वीजेच्या या विस्तृत जाळ्यामुळे शेतीला सर्वदूर वीज उपलब्ध झाली.वड्या वस्त्यांवर वीज पोहचली. छोट्या मोठ्या व्यवसाय, उद्योग धंद्यांनाही वीज मिळू लागली.शहरासह खेडोपाडी विजेवर आधारित शेकडो स्वयंरोजगार निर्माण झाले.


रस्त्यांचे जाळे..

कोणत्याही भागाचा विकास हा तेथील रस्ते किती चांगले आहेत, यावर अवलंबून असतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्याचा पश्‍चिम भाग पूर्णत: डोंगराळ आहे. मुळा, प्रवरा, आढळा या तीन खोर्‍यामध्ये तालुक्याची विभागणी झालेली आहे. लहानमोठ्या टेकड्या, डोंगर, पर्वतशिखरे, नद्या, ओढे यामुळे परस्परांशी दळणवळण ही एकेकाळी अकोेले तालुक्यात जिकीरीची गोष्ट होती. 40 वर्षापुर्वी पश्‍चिम भागातील अनेक गावांना बारमाही रस्ते नव्हते तर अनेक गावांना जेमतेम बैलगाडी जाईल अशा वाटा होत्या. भंडारदरा परिसरातील घाटघर, साम्रद, रतनवाडी आदी गावे, मुळा खोर्‍यातील अंबित, पाचनई, कुमशेत, कोहणे, कोथळे, आढळा खोर्‍यातील तिरढे, पाचपट्टा, एकदरा तसेच सातेवाडी, खेतेवाडी फोफसंडी अशा अनेक गावांच्या नशिबी पावसाळ्यात एखाद्या बेटाचे जीणे यायचे. एव्हढेच नव्हे तर अकोल्यापासून 10-12 किलोमीटर असणार्‍या निंब्रळ, निळवंडे सारख्या गावांनाही होडीतून प्रवरा नदी ओलांडून जावे लागायचे. पावसाळ्यात मुळा, प्रवरा, आढळा या नद्यांना लहानमोठे पूर आले की अनेक गावांचा परस्परांशी संपर्क तुटायचा. अकोल्यातील प्रवरा नदीवरील पुलाचा अपवाद वगळता एकही उंच पुल तालुक्यात नव्हता. मात्र श्री.पिचड यांच्या प्रयत्नाने आता हे सर्व चित्र बदलले आहे. तालुक्यातील सर्व 191 गावे बारमाही रस्त्यांनी जोडली गेली आहेत. धो्धो पावसातही तालुक्यात येणार्‍या पर्यटकांच्या गाड्या आता थेट घाटघर, रतनवाडी अथवा हरिश्‍चंद्रगडाच्या पायथ्याशी असणार्‍या पाचनई, कुमशेतपर्यंत जावू शकतात.


पुलांची साखळी..

पुलांमुळे भूभाग आणि माणसे कशी जोडली जातात याची प्रवरेवरील पुल साखळी हे उत्तम उदाहरण आहे. पूर्व  वाहिनी प्रवरेमुळे अकोल्याचे उत्तर - दक्षिण असे दोन भाग झाले आहे. एक काळ असा होता की प्रवरेला पावसाळ्यात पाणी आले की, दोन्ही काठांचा परस्परांशी संपर्क तुटायचा. कारण पुर्वी प्रवरा नदीवर अकोले येथे एकमेव उंच पुल होता. कळस, रंधा, पिंपरकणे आणि भंडारदरा येथे फरशी पुल होते. पावसाळ्यात हे फरशी पुल वारंवार पाण्याखाली जायचे.

अकोल्याहून संगमनेरला जाणार्‍या अनेक प्रवाशांना पावसाळ्यात कळसजवळील प्रवरा नदी नावेतून ओलांडावी लागायची. कारण संगमनेरला जायला पर्यायी मार्ग नव्हता. पण आता ही परिस्थिती पुर्णपणे बदलली आहे. प्रवरा नदीवर पुलांची एक साखळीच तयार झाली आहे. निळवंडे प्रकल्पामुळे चितळवेढे येथे उंच पुल झाला. भंडारदरा पुलाची उंची वाढविण्यात आली.भंडारदर्‍यापासून कळस पर्यंत प्रवरा नदीवर आता भंडारदरा, रंधा धबधबा, निळवंडे धरण पायथा, चितळवेढे, निंब्रळ, विठा, मेहेंदुरी, अगस्ति सेतूपुल, अकोले, कळस असे दहा पुल झाले आहेत. कळसला झालेल्या मोठ्या पुलामुळे तेथील नाव इतिहासजमा झाली आहे. दोन्हीकाठच्या गावांना आता दुसर्‍या काठावर जाण्यासाठी दोन अडीच किलोमीटरपेक्षा अधिक वळसा घालावा लागत नाही. एकाच तालुक्यात एकाच नदीवर पुलांची अशी साखळी राज्यात अन्यत्र कोठे क्वचितच पहायला मिळते. हे शक्य झाले ते येथील लोकप्रतिनिधींच्या प्रभावी नेतृत्वामुळे. जी गोष्ट प्रवरा नदीची तीच मुळा आणि आढळा या नद्यांची.

 तालुक्यातील मुळा खोरे हा एकेकाळी तालुक्यातील सर्वात दूर्गम भाग होता, त्यामुळे पावसाळ्यात मुळा खोर्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटायचा. मुळा नदीच्या पाण्यामुळे पावसाळ्यात अडीच महिने कोतुळ येथे जाण्यासाठी नावेशिवाय पर्याय नव्हता. काही वर्षापुर्वी कोतुळ, धामणगाव पाटच्या दरम्यान मुळा नदीवर उंच पुल झाला आणि कोतुळची नावही इतिहास जमा झाली. मुळा नदीवरही आता खडकीपासून लहित वाघापूरपर्यंत पुलांची साखळी निर्माण झाली आहे. आढळा नदीवरही देवठाण, सावरगाव पाट, समशेरपूर आदी ठिकाणच्या पुलांची उंची वाढविण्यात आली. अनेक ठिकाणी नविन पुल निर्माण झाले. आढळेचे दोन्ही काठ परस्परांशी जोडले गेले.लहान मोठे ओढे,नाले यांच्यावरही आवश्यक तेथे पूल झाले आहेत.तालुक्यात आज असे शेकडो पूल उभे आहेत.

तालुक्याच्या पश्‍चिम भागात पुर्वी बारमाही रस्ते असणारी गावे  हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी होती.त्यामुळे आदिवासी भागाचे मुख्यकेंद्र असणार्‍या राजूरशी या गावांचा संपर्क तुटायला. तेथील माणसाना अनेक अडचणींचा सामना करायला लागायचा. पण आता पश्‍चिम भागातील प्रत्येक गाव राजूरशी पक्क्या रस्त्याने जोडले गेले आहे. हीच स्थिती मुळा खोर्‍यातील आदिवासी गावांची आहे. कोतुळ, पैठण, कोहणे, कोथळे या रस्त्यामुळे मुळा खोर्‍यातील अनेक आदिवासी गावांचा कोतुळशी आता बाराही महिने संपर्क असतो.भंडारदरा परिसरातील घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे या गावांना जोडणारा रिंगरोड तयार झाला. त्यामुळे या गावांची सोय झालीच पण पावसाळ्यात भंडारदर्‍याला येणार्‍या पर्यटकांनाही आता वैभवी निसर्गाचे दर्शन घडू लागले आहे.

घाटरस्ते..

तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले जात असताना अनेक घाट रस्ते नव्याने अस्तित्वात आले. म्हैसवळण घाटामुळे तालुक्याचा उत्तर भाग इगतपुरीशी जोडला गेला तर चिंचखांड फोडल्यामुळे समशेरपूर परिसर सिन्नरशी जोडला गेला. कोंभाळण्याच्या अवघड घाटामुळे खिरवीरे परिसरातून अकोल्याला यायला नविन मार्ग तयार झाला तर शेरणखेलच्या घाटामुळे अकोल्याहून समशेरपूरला जाणारा नविन मार्ग तयार झाला आहे. मुथाळण्याच्या घाटामुळेही आता समशेरपूर परिसरात पोहचता येते. तर कोतुळला जाणार्‍या चिचखांड घाटामुळे मुळा खोर्‍यातील अनेक गावे अकोल्याच्या जवळ आली आहेत. अशक्य वाटणारा घाटरस्ता तयार झाल्यामुळे फोफसंडी हे अतीदूर्गम गावही तालुक्याशी जोडले गेले आहे.


विकासाच्या वाटा..

तालुक्यात विणल्या गेलेल्या या रस्त्यांच्या जाळ्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे. बारमाही रस्ते झाल्यामुळे शेकडो आदिवासी  तसेच ग्रामीण भागातील मुले मुली राजूर, कोतुळ, अकोले, ब्राह्मणवाडा, शेंडी येथे शिक्षणासाठी जा - ये करु शकतात. तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही शेतकर्‍याला शेती माल मुंबई, पुणे, नाशिक अशा बाजारपेठेत सहजतेने पाठविता येतो. शेतशिवारापर्यंत भाजीपाल्याची माल वाहतुक करणार्‍या गाड्या आता येत आहेत. गावातच डेअरी झाल्यामुळे दुध उत्पादकांनाही आता डोक्यावर किटली घेऊन पायपीट करावी लागत नाही. घाटघर भंडारदर्‍यासह तालुक्यातील कोणत्याही पर्यटनस्थळी पर्यटक बाराही महिने पोहचू शकतात त्यामुळे आदिवासी दूर्गम भागात पर्यटन हा उद्योग नव्याने उदयास येत आहे. या रस्त्यांमुळे पर्यटन विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 

तालुक्यातून जाणारा कोल्हार - घोटी हा राज्य मार्ग हाच तालुक्यातील वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. मात्र गेल्या तीन दशकात या रस्त्यात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेली आणि या रस्त्याने कात टाकली.अकोले देवठाण म्हैसवळ,राजूर कोतुळ  ब्राह्मणवाडा बोटा, अकोले सिन्नर या सारख्या अन्य महत्वाच्या रस्त्यांमध्ये वेळोवेळी मोठी सुधारणा होत गेली.त्या मुळे लगतच्या तालुके जिल्ह्यांशी संपर्क सुलभ झाला आहे.


आधुनिक तिर्थक्षेत्रे..

धरणे, वीज निर्मिती केंद्रे यासारखे मोठे प्रकल्प एखाद्या परिसरात उभे राहतात तेव्हा राज्याच्या दृष्टीने ते आधुनिक तीर्थक्षेत्रे ठरत असली तरी त्या परिसराला मात्र त्याचा विशेष लाभ होतोच असे नाही. धरणांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होतो हे खरे असले तरी धरण प्रकल्पांचा परिसर आणि तेथील माणुस मात्र तसाच उपेक्षित राहतो असाच आजवरचा अनेक धरणांचा अनुभव आहे. तालुक्यातील भंडारदरा धरणही त्याचेच जितेजागते उदाहरण ठरावे. दुष्काळी उत्तर नगर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार्‍या या धरणाने त्या परिसरातील आदिवासी माणसांना काहीच दिले नाही. उन्हाळ्यात आजही भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अनेक वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची वणवण सुरु आहे.जी गोष्ट भंडारदर्‍याची तीच दारणेची, गंगापुरची अन् कोयनेची.

मात्र प्रभावी आणि दुरदृष्टीचे नेतृत्व असेल तर अशा मोठ्या प्रकल्पांचाही स्थानिक परिसर विकासासाठी कसा उपयोग होतो हे तालुक्यात सुरु असणार्‍या निळवंडे आणि घाटघर प्रकल्पांनी दाखवून दिले आहे. किंबहुना मोठ्या प्रकल्पांचा लाभ स्थानिक परिसराला कसा मिळवून द्यावा याचा घाटघर आणि निळवंडेने वस्तुपाठच घालून दिला आहे.हे  राज्याच्या दृष्टीने महत्वाचे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्यात श्री पिचड यांचा महत्वाचा वाटा आहे. प्रकल्प खर्चातून प्रकल्प परिसरात सुरु असणारी रस्ते, पुलांची कामे असोत, प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला मिळणारा पाण्याचा लाभ असो, त्यांच्या पाल्यांना मिळणार्‍या नोकर्‍या असोत की त्यांचे पुनर्वसन असो या प्रत्येक बाबीतुन याची प्रचिती येते. 


घाटघर वीज प्रकल्प..

250 मेगावॅट क्षमतेचा घाटघर, उदंचन जलविद्युत प्रकल्प हा भारतातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प. एकेकाळी अतीदूर्गम गणल्या गेलेल्या घाटघरला जाणार्‍या भंडारदरा - घाटघर हा 22 किलोमीटरचा रस्ता बारमाही वाहतुकीसाठी योग्य झाला तो घाटघर प्रकल्पातूनच. आणि जिल्ह्याची चेरापुंजी समजले जाणारे घाटघर आणि साम्रदची सांदण दरी पर्यटन नकाशावर आले.

 घाटघर जलविद्युत प्रकल्पाला लाभक्षेत्र नसल्यामुळे  त्याला पुनर्वसन कायदा लागू होत नव्हता. मात्र श्री.पिचड यांनी आपले राजकीय वजन आणि प्रशासकीय कौशल्य वापरुन या प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू केला.त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे लाभ मिळू शकले. या प्रकल्पाच्या घाटघर येथील धरणात फक्त 24 घरे बुडणार होती. मात्र या धरणाच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गावालाच पडतो म्हणून संपूर्ण गावाचेच पूनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि  सुमारे 181 जणांच्या घरांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी कोकण कड्याजवळ नविन घाटघर गाव वसविण्यात आले. प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना  सरकारी सेवेत सामावून घेण्यात आले.

घाटघर प्रकल्पात पाण्याचा पुनर्वापर केला जातो. कोकणकड्याशी पायथ्याशी असणार्‍या धरणातील पाणी रात्रीच्या वेळी उपसा करुन घाटघर धरणात सोडले जाते आणि दिवसा या पाण्याचा उपयोग करुन महत्तम मागणीच्या वेळेला वीज निर्मिती होते. मात्र पावसाळ्यात खालचे धरण वारंवार ओव्हरफ्लो होते आणि पाणी नदीला जाऊन मिळते. मात्र श्री.पिचड यांचेमुळे  वाहून जाणारे हे पाणी आता भंडारदरा धरणात सोडले जाते.त्या मुळे तीनशे साडेतीनशे  दशलक्ष घनफुट  एवढे अतिरिक्त पाणी प्रवरा खोर्‍यासाठी उपलब्ध झाले आहे.


निळवंडे धरण..

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे आणि अनेक वर्षे रेंगाळलेले निळवंडे धरण मार्गी लावण्याचे महत्वाचे काम श्री पिचड यांनी केले.तसेच त्यांच्या

 दुरदृष्टीमुळे निळवंडे प्रकल्पाचा अकोले तालुक्याला मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.

आजपर्यंत आधी पुनर्वसन मग धरण या घोषणा फक्त ऐकल्या जात होत्या. पण निळवंडेच्या बाबतीत ही घोषणा श्री पिचड यांच्यामुळे प्रत्यक्षात आली. निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचा  पॅटर्न राज्यभर गाजला. निळवंडे धरणात दोन गावे पुर्णत: बुडाली तर 11 गावे अंशत: बाधीत झाली आहेत. या बाधीत गावांच्या उर्वरीत क्षेत्राला पाणी मिळावे यासाठी निळवंडे जलाशयातून चार उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे  तालुक्यातील 2 हजार 290 हेक्टर अतिरिक्त क्षेत्रास निळवंडेचा लाभ मिळणार आहे .अकोले तालुक्यातील निळवंडेच्या लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा म्हणून उच्च स्तरीय पाईप कालव्यांची योजना राबविण्यात आली. त्यामुळेही तालुक्यातील 2 हजार 328 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. एकाच धरणाला दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर चार कालवे असणे हे राज्यातील एकमेव उदाहरण असेल. 

निळवंडे धरणाचा लाभ मूळ योजनेनुसार तालुक्यातील 4 हजार 235 हेक्टर क्षेत्रास होणार होता. मात्र आता जलाशयातील उपससिंचन योजना व उच्च स्तरीय कालवे या मुळे भिजणारे क्षेत्र विचारात घेता तालुक्यातील 8 हजार 853 हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. श्री पिचड यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील 4 हजार 618 हेक्टर जास्त क्षेत्रास लाभ मिळणार आहे.

निळवंडे जलाशयात उभा रहात असलेला उड्डाणपूल हा एखाद्या जलाशयातील अशा प्रकारचा पहिलाच पुल होय. त्याचा लाभ 14 आदिवासी गावांना होणार आहेच. पण पर्यटकांच्या दृष्टीनेही हा पुल भविष्यात आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे जलाशयातील उपसा जलसिंचन योजना, उच्चस्तरीय कालवे अथवा जलाशयातील उड्डाणपूल यांचा मुळ प्रकल्पात समावेश नव्हता. श्री.पिचड यांच्या विशेष प्रयत्नामुळे नंतर प्रकल्पात त्यांचा समावेश करण्यात आला.

तालुक्यात शेकडोंच्या संख्येने झालेले लहानमोठे बंधारे, पाझरतलाव, तळी, वनबंधारे यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडले गेले. आढळा, मुळेवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे तालुक्यात निर्माण झालेले पंधरा ल. पा. तलाव आणि निळवंडे धरण यामुळे तालुक्याला सिंचनाचा मोठा लाभ  मिळू लागला. ठिकठिकाणी विहीरींवर ओढे आणि नद्यांवरील उपसा जलसिंचन योजनांवर वीज पंप बसले. वीजेच्या सर्वदूर जाळ्यामुळे वीजेची कमतरता जाणवली नाही. शेतशिवारात पाणी फिरु लागले, जागोजागी समृध्दीची बेटं तयार झाली. आज तालुक्यातून दरवर्षी टोमॅटो, कांदे व भाजीपाल्याच्या हजारो ट्रक शहराच्या बाजारपेठेत जात असतात. चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे दुध धंद्यातही वाढ झाली. काही लाख लिटर दुध तालुक्यात तयार होते. तालुक्यातील शेतकर्‍यांनी यावर्षी सुमारे साडेचार लाख टन उस निर्माण केला. वीज, रस्ते आणि पाण्याच्या बाबतीत झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेती आणि शेतीपुरक उत्पन्नात मोठी वाढ झाली. तालुक्याच्या अर्थकारणाला गती प्राप्त झाली. आज तालुक्याचा जो विकास दिसत आहे, त्यात या पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे.

आरोग्य सेवेचे जाळे..

पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गेल्या 30-40 वर्षात मोठे बदल झाले. पुर्वी दुर्गम भागातील एखादा माणूस आजारी पडला तर त्याला डोली करुन राजूरला आणावे लागायंचे.कारण गाव पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती.रस्ते नव्हते. मात्र श्री.पिचड यांच्या कारकिर्दीत तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. तालुक्यात अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर येथे ग्रामीण रुग्णालये आहेत तर अकरा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. शिवाय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक उपकेंद्रे आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा गावपातळीपर्यंत पोहचली आहे. त्याचा मोठा लाभ ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेला होत आहे.

पुर्वी अकोले तालुक्यात शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी होते. जिल्ह्यात सर्वाधिक निरक्षर एकेकाळी अकोले तालुक्यात होते. तालुक्याच्या आदिवासी भागात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळांनी मोठी भूमिका बजावली. आज तालुक्यात 14 शासकीय आश्रमशाळा आहेत.शिवाय अनुदानित आश्रम शाळा वेगळ्याच. त्यातून हजारो  आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10 वी व 12 वी नंतर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर, ब्राह्मणवाडा, शेंडी या ठिकाणी वसतिगृहे काढण्यात आली आहेत. त्याचा लाभ काही हजार आदिवासी मुलामुलींना होत आहे.  याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी श्री.पिचडांच्या विशेष प्रयत्नामुळे संगमनेर, श्रीरामपूर, नगर याठिकाणीही आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे सुरु करण्यात आली त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.


अगस्ती कारखान्याची निर्मिती..

श्री.पिचड यांच्या प्रयत्नामुळे 30 वर्षापुर्वी अगस्तिसहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळाली. कारखान्याला पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी  त्यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करुन देऊन त्यांना कारखान्याचे भागधारक बनविले आणि नऊ महिन्यात कारखान्याची उभारणी केली. मध्यंतरीच्या दोन वर्षाचा अपवाद वगळता गेली 30 वर्षे त्यांनी कारखाना सक्षमपणे चालवला. गत वषी कारखान्याचा आसावनी प्रकल्प सुरू झाला.करखाण्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. कारखान्यानेे तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.

दूर्गम भागापर्यंत पोहचलेले रस्त्यांचे जाळे तसेच अभयारण्य क्षेत्रात आणि क्षेत्राबाहेर राबवलेल्या विविध पर्यटन विषयक योजना यामुळे पर्यटन विकासाला गती मिळाली. कळसुबाईच्या शिखरावर वीज पोहचली. पट्टा किल्ल्याचे स्वरुप बदलले.रंधा धबधब्याचे आधुनिक पध्दतीने सुशोभिकरण करण्यात आले. अभयारण्य क्षेत्रात ठिकठिकाणी निसर्ग निरीक्षणासाठी मनोरे, पॅगोडा, तंबुसाठी ओटे, जागोजागी केलेले रेलिंग, शिखरावर जाण्यासाठी बसवलेल्या शिड्या ,धबधब्या जवळ पूल आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या.यामुळेही पर्यटन विकासाला चालना मिळाली. आदिवासी तरुणांना करण्यात आलेले बोटीचे वाटप, त्यांना दिलेले कॅमेरे, चायनीज स्टॉल, टुरिस्ट गाईड प्रशिक्षण या सर्वांमुळे आज पर्यटन हा तालुक्यात रोजगाराचा महत्वाचा विषय झाला आहे.

पाणी, वीज, रस्ते यात झालेल्या पायाभूत सुविधा, अगस्ति कारखान्याची निर्मिती, पर्यटन विषयक राबवलेल्या योजना, शिक्षण आणि आरोग्यासाठी झालेले प्रयत्न व त्यातुन निर्माण होत गेलेले कुशल मनुष्यबळ या सर्वांमुळे एकेकाळचा उपेक्षित अकोले तालुका बदलत आहे. या बदलाचे श्रेय जसे येथील जनतेच्या निर्मिती क्षमतेला आहे, कष्टाला आहे तसेच हे सर्व करणार्‍या दुरदृष्टीच्या नेतृत्वालाही आहे. 


चौकट :- 

विज वितरणाचे जाळे :- 

विज उपकेंद्र 132 केव्ही - अकोले, भोजदरी
विज उपकेंद्र 33 केव्ही - अकोले, समशेरपूर, केळीसांगवी, रुंभोडी, आंबड, लिंगदेव, विरगाव, कुंभेफळ, राजुर, शेंडी, शेलविहीरे, वाघापूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा, कोहणे.
शासकीय आश्रमशाळा - घाटघर, पिंपरकणे, केळी रुह्मणवाडी, खिरविरे, केळी कोतुळ, मुतखेल, कोहणे, तिरढे, पळसुंदे, पैठण (कन्या), शिरपुंजे, मवेशी, आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी, इंग्रजी माध्यम आश्रमशाळा राजूर कॅम्प मवेशी.
अनुदानित आश्रमशाळा - प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मान्हेरे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेंडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कोथळे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा देवठाण, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा एकदरे, प्राथमिक आश्रमशाळा शेरणखेल.
आरोग्य विभाग :- ग्रामीण रुग्णालय - अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर
प्राथमिक आरोग्य केंद्र :- ब्राह्मणवाडा (उपकेंद्रे -7) , खिरविरे (उपकेंद्र - 8), कोहणे (उपकेंद्र 7), कोतुळ (उपकेंद्रे 6), लाडगाव (उपकेंद्र 9), मवेशी (उपकेंद्रे 7), म्हाळादेवी (उपकेंद्रे 5), सुगाव (उपकेंद्रे 5), देवठाण (उपकेंद्रे 6), शेंडी (उपकेंद्रे 2), पांजरे (उपकेंद्रे 6), विठा (उपकेंद्रे 3).
शासकीय वसतिगृहे :- राजुर मुले, राजुर मुली, अकोले मुले, अकोले मुली, शेंडी मुले, शेंडी मुली, कोतुळ मुले, समशेरपूर मुले, ब्राह्मणवाडा मुले याशिवाय संगमनेर, घारगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, पारनेर, राहुरी येथेही शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत.
लघु पाटबंधारे प्रकल्प :- अंबित (193 दलघफू), बलठण (202 दलघफू), देवहंडी (155 दलघफू), कोथळे (182 दलघफू), घोटी शिळवंडी (160 दलघफू), बोरी (47.80 दलघफू), वाकी (112 दलघफू), टिटवी (303 दलघफू), सांगवी (71 दलघफू), पाडोशी (146 दलघफू), बेलापूर (94 दलघफू), पिंपळगाव खांड (600 दलघफू), पळसुंदे (200 दलघफू).

No comments:

Post a Comment