Thursday, May 5, 2016

आज 'ऍग्रो वन'मध्ये आलेल्या माझ्या या लेखावर भरपूर शेतकरी, शेतकरी संघटनेतील नेते, कार्यकर्ते यांचे फोन आले. मी लिहिलेल्या आणि चांगला प्रतिसाद मिळालेल्या निवडक लेखांपैकी असावा हा लेख. या प्रतिसादातून अस्वस्थता वाढत गेली, कारण शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या आईबापाचं जगणं माहिती नसते! वाईट याचे वाटते की, समाजातल्या वास्तवापासून आमचे शिक्षण कायम तुटक असल्यासारखे वागते! यातून अनेक विसंगती पोसत असते!
शक्य असल्यास लेख जरुर वाचा.
ऍग्रो वन स्पेशल
शेतकऱ्यांना आंदोलन का करावं लागतं?
भाऊसाहेब चासकर
Sunday, April 10, 2016
Tags: agro one special
प्राथमिक शाळेतली मुलं आपल्या आई-बापाच्या शेती व्यवसायाकडं कसं पाहतात, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दलचं त्यांचं आकलन कसं असतं, हे जाणून घेतलं, तर एक वेगळंच वास्तव समोर येतं. शेतकऱ्यांच्या दुःखाचं मूळ कशात आहे, हे या वयातच मुलांना समजावं यासाठी एका प्रयोगशील शिक्षकानं केलेली ही उठाठेव.
👉"उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर' अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या रोजच्या परिपाठात मुलांनी ती वाचली. बातमीवर चर्चा सुरू झाली. मुलं मते मांडू लागली. "शेतकऱ्यांना भावासाठी आंदोलन का बरं करावं लागतं?' एका मुलानं प्रश्न विचारला. नेहमीप्रमाणं सुरवातीला मुलांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. मयूर म्हणाला, की उसाला भाव वाढून मिळावा म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. "आंदोलन म्हणजे काय रे?' मी खडा टाकून पाहिला. मुलं म्हणाली, ""आपल्या मागण्या मान्य करून घ्यायला लोकांना आंदोलन करावं लागतं. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजी पण आंदोलनं करायचे...'' प्रसादनं उदाहरणासह मुद्दा स्पष्ट केला. "आंदोलन कोणाच्या विरुद्ध असतं?' मुद्दा पुढं नेण्याच्या हेतूनं मी विचारलं. बहुसंख्य मुले म्हणाली "सरकारच्या!' "शेतकरी शेतात मातीत राबतो. भरपूर कष्ट घेतो. शेतीतून माल पिकवतो. सरकारनं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यायला पाहिजे. सरकार भाव देत नाही म्हणून शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. तोटा होतो म्हणून लोक चिडत्यात. आंदोलनं करत्यात.'' एकमेकांच्या मुद्द्यात भर घालीत मुलांनी परस्पर सहकार्यानं प्रश्नाचं नेमकं उत्तर तयार केलं!
उसाच्या उत्पादनासाठी एकरी होणारा खर्च, लागवडीपासून रात्रंदिवस घ्यावी लागणारी मेहनत यावर तपशीलवार चर्चा झाली. केवळ ऊसच नाही तर कांदा, टोमॅटो, भाजीपाल्यासह इतरही पिकांच्या एकूण अर्थकारणाविषयी बरंच बोलणं झालं! आमच्या बहिरवाडीच्या (ता. अकोले, जि. नगर) शाळेत येणारी जवळपास सगळी मुलं तशी शेतकऱ्यांचीच; परंतु यातल्या बऱ्याच मुलांना एखाद्या पिकासाठी येणारा उत्पादन खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न माहीत नव्हतं. गप्पांतून पिकाला अमूक इतका खर्च येतो, हे बहुतेकांना पहिल्यांदाच कळलं! एखादं पीक शेतात लावल्यापासून ते बाजारात विकेपर्यंत शेतकऱ्याला काय काय दिव्यं करावी लागतात, हेही मुलांना नीट माहीत नव्हतं. "जमिनीवरचं वास्तव' पाहून आम्ही शिक्षकही चक्रावून गेलो!
कोणत्याही पिकाच्या विक्रीतून शेतकऱ्याला फायदाच होतो, अशी सर्वच मुलांची धारणा होती. आमच्या शाळेतली मुलं तशी बारा-तेरा वर्षे वयापर्यंतची म्हणजे तशी लहान वयोगटातली; पण शेतकऱ्यांचं म्हणजे स्वतःच्या बापाचंच जगणं मुलांना नीट समजलेलं नसल्याचं नागडं वास्तव या गप्पांतून अधोरेखित झालं. ते अस्वस्थ करत राहिलं. ग्रामीण भागात घरातल्या मुलांना चर्चेत सामावून घेतलं जात नाही. निर्णय प्रक्रियेत मुलं-मुली-महिलांना आजही फारसं स्थान नसतं. आमची पाठ्यपुस्तकंदेखील शेतकऱ्यांचं हसरं आणि शेताचं हिरवंगार चित्र रंगवत असतात. मुळात पाठ्यपुस्तकं वास्तवाला भिडतच नाहीत! शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा संघर्ष त्यातून पोचत नाही. परिणामी आजच्या समाज वास्तवाशी विद्यार्थ्यांचा सांधा जुळत नाही.
शेतकऱ्याच्या दु:खाचं मूळ नेमकं कशात आहे, शेतीमाल निघाल्याबरोबर त्याचे भाव का पडतात, आणि याला कोण जबाबदार आहे, हे मुलांना याच वयात समजायला हवं, असा विचार मनात आला. तशी चर्चा आणखीन जराशी पुढं सरकली. "शेतात कोण राबतं रे?'मुलांना विचारलं. "आमचे आई-बाप.' मुलांचं उत्तर. शेतकरी पिकाला जीव लावतात. तळहातावरच्या फोडासारखं जपतात. विजेच्या भारनियमनामुळे रात्री-अपरात्री पाणी द्यायला जातात. त्यांना विंचू-साप चावतात. ते थंडी-वाऱ्यात कुडकुडतात. बिबट्याच्या हल्ल्यात जिवानं जातात. खतं-औषधं यासाठी उधारी-उसनवारी करतात. हे करताना अनेकदा कर्जबाजारी होतात. यातून शेतीच्या आतबट्ट्याच्या व्यवसायाचं चित्र मुलांच्या बोलण्यातूनच मुलांसमोर आलं. काहींना हे जरा जरा माहीत होतं; पण इतकं चिकित्सकपणे या विषयाकडं आजवर कोणी पाहिलं नव्हतं.
सहावीतला कुणाल संवेदनशील आणि विचारी मुलगा. तो म्हणाला, ""ऊस, टोमॅटो, कांदा असं काहीही असू द्या. शेतकरी कष्ट करतो. मग पीक आल्यावर त्याला भाव का बरं देत नाही?'' आपले आई-बाप राब-राब राबतात. अहोरात्र खपतात. पिकवतात; पण उत्पादित मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आपल्या आई-बापाला नाहीये. पीक कोण घेतं? आणि भाव कोण ठरवतं? असं चर्चेला जोरदार वळण मिळालं. ""शेतकरी पिकवतो ना? मग भाव ठरवायचा अधिकार बी त्यालाच पाहिजेल,'' सातवीतल्या अंकितानं ठासून सांगितलं. ""किराणा माल, बिस्कीट, कपडे, सोने-चांदी घ्यायला बाजारात गेल्यावर दुकानदार पैसे कमी करत नाहीत. मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच असं का बरं होतं?'' शीतलचा बिनतोड प्रश्न. मग मी शेतकरी कवी इंद्रजित भालेरावांच्या काही कवितांचा संदर्भ देत मुद्दा स्पष्ट केला. शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी आणि राजू शेट्टी यांच्या चळवळीविषयी थोडंसं सांगितलं. प्रश्न काढून आणा. खासदार राजू शेट्टी यांना फोन लावू. त्यांची मुलाखत घेऊ, असं मुलांना सुचवलं. दुसऱ्या दिवशी खासदार शेट्टींना फोन लावला. टीव्हीवर, पेपरात दिसणारा खासदार आपल्याशी फोनवर बोलतोय, याचा मुलांना खूप आनंद झाला. मुलांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले. शेट्टींनी मुलांच्या पातळीवर येऊन प्रश्नांची उत्तरे दिली. लहान मुलांचे इतके चिकित्सक प्रश्न ऐकून त्यांनी मुलांना शाबासकी दिली. शिवाय "तुमची शाळा शेतकरी चळवळीला अभ्यासू कार्यकर्ते देणार,' अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. आम्ही शेट्टी साहेबांशी बोललो, असे मुलांनी घरी जाऊन सांगितले. पालकांचा आधी विश्वासच बसेना. खरे समजल्यावर त्यांना मुलांचे कौतुक वाटले. इंद्रजित भालेरावांचे कवितासंग्रह मुलांना वाचायला दिले. मुलांच्या अनेक कविता तोंडपाठ झाल्या. आता मुले या विषयाकडे डोळसपणे पाहू लागली. मुले स्वतः शेतकऱ्यांच्या सद्यःस्थितीविषयी लिहू लागलीत.
शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना त्यांच्याच प्रश्नांची जाणीव नसल्याचे वास्तव आम्हाला हादरवून टाकणारे होते. पाठ्यपुस्तकांतल्या चित्रांत दिसणारे शेतकरी स्त्री-पुरुषांचे गोरेगोमटे, नीटनेटके, देखणे चेहरे प्रत्यक्षात शेतामातीत शोधूनही सापडत नाहीत. "पीक खुशीत डोलतंया भारी, भरला आनंद समद्या शिवारी...' अशा समृद्धीचं गाणं गाणाऱ्या कवितांतून आणि धड्यांतून इथलं दारुण वास्तव पोचत नाही. ऋतुबदल, पिके, शेतीभाती एवढ्यापुरताच तिथला "परीघ' मर्यादित असतो! अस्मानी-सुलतानी संकटांनी नाडलेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना, दु:ख पाठ्यपुस्तकांतून मुलांना भेटत नाहीत. समजा भेटल्या तरी त्या ललितरम्यतेत हरवलेल्या असतात. परिणामी वास्तव समजून घेताना मुलांना अडचणी येतात.
मार्च महिन्यात पाच-सहा दिवस आवकाळी पावसाने जोरात धिंगाणा घातला होता. पाऊस आणि गारपिटीने पिके होत्याची नव्हती झाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. नुकसानभरपाईसाठी आंदोलनं सुरू झाली. मग या विषयावर तर मुलांनी आपणहून परिपाठात चर्चा घडवून आणली. "आपण झाडं तोडली. गाड्या-कारखाने यांचा कार्बन वातावरणात सोडला. त्यामुळे तापमान वाढले. हिमशिखरं वितळत आहेत. ओझोनचा थर पातळ होतोय, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येऊ शकतील. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पाणीपातळी वाढत आहे. माणसाने हवा, माती, पाणी दूषित केले. म्हणून निसर्गाचा कोप झालाय...' मुलं किती नेमकेपणानं सांगत होती! त्यातून बाहेर पडायला आपण काय करायला हवे, असे विचारल्यावर मुलांनी किती छान गोष्टी सांगितल्या-
1. फटाके बनवायला लागणाऱ्या कागदासाठी झाडे तोडतात म्हणून सगळ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायची.
2. प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यायचे आणि ते जगवायचे. (शाळेतल्या मुलांनी दीड हजार झाडे लावलीत आणि जोपासलीत.)
3. प्लॅस्टिक पर्यावरणाचा शत्रू आहे म्हणून ते वापरायचे नाही. कापडी पिशव्या वापरायच्या.
4. मोठे झाल्यावर एक दिवस मोटारसायकलऐवजी सायकल वापरायची.
5. रासायनिक खते आणि औषधांमुळे मातीचे खूप नूकसान झालेय. अनेक मुंग्या आणि मुंगळे, विंचू त्यामुळे मेलेत, नष्ट झाले आहेत. म्हणून सेंद्रिय शेती करायची. गावठी बी-बियाणे गोळा करायचे.
पर्यावरणाचा सबंध विचार मुलांच्या बोलण्यातून समोर आला. शिक्षक म्हणून हा अनुभव खूप सुखावणारा होता.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या राज्य किसान सभेचे नेते एके दिवशी शाळेत आले. शाळा बघून झाल्यावर मुलांशी गप्पा मारायची लहर त्यांना आली. आम्ही मुलांना त्यांचा त्रोटक परिचय सांगितला. मुलांशी गप्पा सुरू झाल्या. आमचा संकल्प म्हणजे एकदम चुणचुणीत. तो म्हणाला, ""साहेब, तुम्ही बघत्यात. शेतकरी थंडी-वाऱ्यात शेतात किती राबत्यात. माल पिकवित्यात. तो माल विकल्यावर त्यांना फायदा व्हायला पायजेल ना? मग तोटाच कसा काय होतो? शेतकऱ्यांना फायदा होईल असा भाव द्या असं तुम्ही सरकारला सांगायला पाहिजे!'' संकल्पने फेकलेला गुगली चेंडू त्या बेसावध नेत्याच्या एकदम अंगावर गेला. ते म्हणाले, ""बाळा, तू फार लहान वयात फार मोठा प्रश्न विचारलास. तुला खरं सांगतो, आम्ही सारे मोठे लोक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहोत.'' ""शेतकऱ्याने नाही पिकवले तर शहरातले लोकं काय खातील?'' असा रास्त प्रश्न अभिजितनं उपस्थित केला. तोच धागा पकडत ऋषिकेशने इंद्रजित भालेरावांच्या कवितेतल्या ओळी त्यांना ऐकवल्या- ""सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा
तर तुम्ही काय खाल धत्तुरा?''
ंमुलांच्या या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं त्या नेत्याकडे नव्हती. त्यांची भंबेरी उडाली. "उशीर होतोय. मी येतो...' म्हणत त्यांनी शाळेचा निरोप घेतला. मुलांनी त्या नेत्याला निरुत्तर केलं, यापेक्षा मुलं शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे चिकित्सक नजरेनं बघत आहेत, हे महत्त्वाचं!
- 9422855151
(लेखक प्रयोगशील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.)
LikeShow more reactions
Comment
नितीन खंडाळे भाऊची 'भिंतीबाहेरची शाळा' !!!
ध्यास प्रगल्भतेचा
ध्यास प्रगल्भतेचा वाहवा..
मुलांमधील जाण आकाराला येतेयं..
👌🏼 👌🏼 👌🏼 👍🏼 👍🏼 👍🏼
Bhausaheb Chaskar
Like · Reply · 6 · April 10 at 3:0

Wednesday, April 20, 2016

राजूर,ता . २०: सेवानिवृत्ती म्हणजे सामाजिक कामाचा शुभारंभ  सेवानिवृत्त व्यक्तीने तो स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी असे उद्गार आपल्या सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक एन . डी . भांगरे यांनी   कोहने तालुका अकोले येथे बोलताना काढले . कोहने आश्रमशाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी एन . डी . भांगरे कामाठी एम . ए . साबळे यांना कोहने ग्रामस्थ व कर्मचारी यांच्या वतीने स्वनिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे विस्तार आदिकारी सुनील ढोबळे व सरपंच सौ . जीजाताई भांगरे यांच्या  शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पोपटराव व्यवहारे , रोहिदास साबळे ,  , विलास बिडवे , रोकडे सर दातीर सुनंदा आदींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या . प्रसंगी सरपंच सौ . जीजाताई भांगरे यांनी एन . दि भांगरे यांनी सामाजिक भावनेतून शिक्षणाचे काम प्रामाणिक पाने केले असून त्यांच्या प्रयत्नानेच या शाळेची गुणवत्ता वाढली दीपक बोऱ्हाडे यांनी सूत्र संचलन तर विकास खेडकर यांनी आभार मानले . सोबत फोटो rju २०प १  मुख्याध्यापक एन . डी  भांगरे यांच्या सेवानिवृत्ती बाबत सत्कार करताना शिक्षण विस्तार अधिकारी सुनील ढोबळे दिसत आहे .























Tuesday, April 19, 2016

अकोले तालुका पर्यटन

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. या गिरीदुर्गाच्या मधे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरु होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे.

कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे. दुर्गम ठिकाणी वसलेल्या फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. कुंजरगडाला भेट देण्यासाठी एका मार्गाने चढाई करुन दुसर्‍या मार्गाने उतरल्यास एक उत्तम अशी भटकंती करता येते.शांताराम काळे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव जोगा हे धरण आहे. धरणाच्या दक्षिणेकडून अहमदनगर-कल्याण हा राजरस्ता जातो. तर पाण्याच्या फुगवट्याच्या उत्तर अंगाने खिरेश्वरला जाणारा गाडीरस्ता आहे. या रस्त्यावर गवारेवाडी नावाची लहानशी वस्ती आहे. येथे पायउतार होणे सोयीचे आहे. येथून खिरेश्वर तीन-चार कि.मी. आहे. धरणाच्या जलाशयाकडे पाठ केल्यास समोर बालाघाटाची डोंगररांग पूर्व-पश्चिम पसरलेली दिसते. या डोंगररांगेत एक नाकाड थोडे बाहेर आलेले दिसते. या नाकाडाच्या बाजूला एक घळ उंचावरुन खाली आलेली आहे. याच घळीमधून फोफसंडीला जाणारी पायवाट आहे. या वाटेची चौकशी वाडीतील गावकर्‍यांकडे केल्यास फायद्याचे ठरते.

आपण तासाभरात घळीच्या माथ्यावर पोहोचतो. जशी जशी आपण उंची गाठतो तसे तसे माळशेज परिसराचा निसर्ग आपल्यासमोर उलघडत जातो. माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड दिसू लागतात.


 

घळीच्या माथ्यावरुन डावीकडे वळून आपण फोफसंडी च्या वाटेला लागायचे. अनेक टेकड्या आणि घळीना वळसे मारीत आपण दोन-एक तासात फोफसंडीमध्ये दाखल होतो.

फोफसंडीतून समोरच कुंजरगडाचे दर्शन होते. गडाची येथून पुढची वाट सोपी आहे. तरी फोफसंडीतून एखादा वाटाड्या अवश्य घ्यावा कारण वाटाड्या असल्याशिवाय कुंजरगडाला असलेला एक निसर्गनिर्मित चमत्कार आपल्याला पहायला मिळणार नाही.

कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायर्‍यांचा मार्ग आहे. पण समोरच्या तुटलेल्या तटबंदीमधून गडप्रवेश करता येतो.

कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात.

गडाच्या माथ्यावरुन मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते. संपूर्ण गडफेरी करण्यास तासभराचा अवधी पुरतो.

गडफेरीकरुन पायर्‍यांच्या मार्गाने गड उतरावा. पायर्‍या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. इथेच सोबतच्या वाटाड्याची गरज लागते. गुहेच्या आतल्या कोपर्‍यात एक सापट तयार झाली आहे. विजेर्‍यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जावून नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमीनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.

Sunday, October 4, 2015

दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी चांगला परिसर अशी कळसुबाई रतनगड हरिश्चंद्रगड माळशेज घाट या भागाची आजवरची ओळख आहे, मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय ती येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे! मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव... तो संपतो न संपतो, तोच सुरु होणारा जलोत्सव... आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई - हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे.
फुलाची ही दुनियाच अदभूत अशी आहे. किती किती फुले? त्यांच्या त-हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना.. प्रत्येकाचे आपले निराळे वैशिष्ट्ये. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वास नसलेली... काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकपक्षी! पिवळीधमक सोनकी तर आठ - पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करते, कारवी मात्र रुसून बसल्याप्रमाणे सात वर्षे मुक्यानेच काढते अन सप्तपदी भरली की फुलांनी फुलून सुगंधाने मोहरून जाते. कारवीची फुले निळ्या रंगाची असतात. ती फुलली की सारे रान निळे निळे दिसू लागते. कारवीच्या या रंग आविष्कारला सुरुवात झाली की स्थानिक आदिवासी ' नीळ आली,नीळ आली' असे म्हणू लागतात.
सर्वोच्च शिखर कळसुबाई, खड्या उंचीचा महाकाय हरिश्चंद्रगड, बुलंद, बेलाग अशा विशेषणांना साजेसे अलंग, मदन, कुलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकुट. पाबर, भैरव, शिंदोळा, घनचक्कर, कात्राबाई यांना सामावून घेणारी दुर्गराज रतनगडाची बलाढ्य पर्वतरांग. अस्ताव्यस्त पसरलेले दुर्गम डोंगरकडे आभाळाला भिडणारे सुळके, उरात धडकी खोल द-या, जीवघेणे उतार, साम्रदची सांदण.... आणखीनही बरेच काही..... निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेली ही ठिकाणे पाहिली की भटकंतीचे चीज होते.
हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे. त्यात रानफुलांबाबत सह्यगिरी आणि त्यातही कळसुबाई हरिश्चंद्रगडाचा हा परिसर [कासच्या पठाराच्या बरोबरीने] जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी ( हॉट स्पॉट) एक समजला जातो. पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीने हिरवा शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत आहे. फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे. रुंजी घालणा-या मधमाश्या फुलांना बिलगताहेत.... निसर्गाने गंधर्व - किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट उनाड वा-यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानप-यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवत आहेत. या मयसभेतील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची भैरवी आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. मान्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरुवात होते.
फुलझाडाचे प्रामुख्याने गवतवर्गीय, झुडूप,वेली आणि झाडे असे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. कारवीचा अपवाद वगळता येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीने उगवलेली वा-यावर डोलणारी गवतफुले पाहिली की, आपले मनही नकळत 'गवत फुला रे गुवत फुला...' म्हणू लागते. काही फुले सुंदर, मोहक, सौंदर्यवान नववधूसारखी ! काही एकदम चिमुकली नाजुकशी म्हणजे १.५ मिलीमीटरची तर काही अगदी टपोरी २५० मिलीमीटर आकाराची. वर्षभरात फुलणा-या फुलांत पांढ-या रंगाच्या फुलांचा भरणा सर्वाधिक असतो. त्याखालोखाल गुलाबी, निळा, पिवळा, लाल, हिरवा या रंगांचा क्रमांक लागतो.
नवरात्रोत्सवाचे आणि फुलोत्सवाचे अतूट नाते आहे.अगदी वर्षानुवर्षांचे. सह्याद्रीत सर्व ऋतुंमध्ये फुलणा-या रानफुलांची संख्या पाचशेच्या घरात आहे. परंतु याचा बहर पीक पॉईंटला असतो तो सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये. सध्या अनेकविध फुले फुललेली असली तरीसगळ्यात जास्त भाव खातेय ती पिवळी सोनकी!
सोनकीच्या इटुकल्या-पिटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पर्वतपठारे पीतवर्णी दिसताहेत. तिला सोबत आहे ती रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी - नभाळी, धालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी... आणखी कितीतरी फुलांची! मुळातच हरिश्चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्ष-लतांची साथसोबत या भागाला लाभली आहे. युगानुयुगांची.
येथील नवलाई स्थळविशेष गूढरम्यता, नीरव शांतता, पावित्र्य आजवर अनेकांनी न्याहाळले आहे. विविधांगांनी. मात्र 'माउंटन ऑफ फ्लावर्स' ही या सह्यापर्वताची ओळख नव्यानेच होते आहे. सभोवतीच्या गिरीशिखारांप्रमाणेच ही इवलाली रानफुले निसर्ग प्रेमींना साद घालताहेत. मग कधी येताय?

Friday, August 7, 2015

जात्यावरच्या ओव्या, भूपाळया गेल्या कुठे?..

आमची आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते.
villege jateआमची आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते. पहाटे उठून आजी ‘वळयत’ जाते मांडायची पायलीभर नाचणे तासाभरात दळून संपवायची.
पहाटेची निरव शांतता, जात्याची मंजुळ घरघर यात आजीच्या कंठातून उमललेल्या सुमधुर ओव्यांचा मिलाफ हवाहवासा वाटायचा! आजीच्या ओव्या आमच्या घराच्या प्रत्येक अवयवाला परिचयाच्या आहेत. आजीच्या ओव्यांचे आमच्या घरावर संस्कार झाले आहेत.
पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला .. राम या देवाला
दुसरी माजी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला.. कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं.. पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला.. विठ्ठल देवाला
संत जनेच्या मदतीला विठ्ठल धावला होता. असं सांगितलं जातं. आमची आजी या ओव्या देवांच्या चरणी अर्पण करायची. त्या मनमुक्त म्हणायची. दळता दळतानाच स्वत:लाच हरवायची.  तिची देवावरील श्रद्धा भाव प्रेम तिच्या ओवीत आणि दळतानाच्या समर्पणात दडले होते.
आमच्या आजीने श्वासाच्या अंतापर्यंत जाते ओढले पण ती कधी थकल्याचे जाणवले नाही. किंवा दळण्यासाठी कधी कुरकुरही केली नाही. याचे श्रेय कोकणच्या निसर्गाला आहे. अशा प्रकारचे निरामय आरोग्य कोकणच्या माणसाला लाभले आहे. कोकणच्या नंदनवनात नांदणारे हेच ते तेजस्वी चैतन्य जे प्रत्येक माणसाच्या हृदयात नांदते आहे. हा चैतन्यरूपी विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आहे. पण हा खरा देव आम्हाला कधी कळलाच नाही. म्हणूनच एकेकाळी तुकाराम महाराज आंतरिक म्हणाले..
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
विसरोनी गेले ख-या देवा
कोकणात नांदणारा निसर्गरूपी देव आपला खरा देव आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही सगळी पंचतत्त्वे, आपल्या देशात नांदतात, आपला देहत्व मुळी परमेश्वर स्वरूपी चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक नियमाला आपण बांधील आहोत. त्यांच्याशी आपलं अतुट नातं आहे. निसर्गाच्या नियमांशी आपण सुसंगत वागलेच पाहिजे. या निसर्गाच्या नियमांशी आपले वाडवडील सुसंगत वागले. म्हणूनच या निसर्ग देवतेने त्यांना आमच्या आजीसारखे निरामय आरोग्य बहाल केले. आमच्या आजोबांनाही निरामय असे दीर्घायुष्य लाभले.
आमचे आजोबा वारकरी होते. गळयात तुळशीमाला धारण केली होती. केशरी गंधाचा टिळा कपाळी लावीत. आजोबा प्रात:काळी लवकर उठायचे ‘उठा उठा सक ळीक वाचे स्मरावा गजमुख’ हे गजाननाचे स्मरण प्रात:काळच्या मांगल्याला भारून टाकायचे. आजोबांच्या या भूपाळया संस्कार रूपे आम्हालाही अवगत आहेत.
पहाटेच्या आजीच्या ओव्या आणि आजोबांच्या भूपाळया. पहाटे कोंबडा आरवल्यापासून उजाडेपर्यंत काम करतानाही भगवंताचे स्मरण माणसाच्या हृदयातील ईश्वरतेचा विकास आहे. त्याच्या प्रक्षेपणाचा प्रकाश आहे! ही दिव्यत्वाची प्रभा आहे.
आपल्या संचीतात पुण्याईचा साठा करणारे हे पुण्यधन आहे! हे दिव्यत्व हे पुण्यधन तुम्हाला आम्हाला सगळय़ांना या निसर्ग देवतेने अगदी सहज बहाल केले आहे. निसर्गाच्या या वरदानाचा आपण सदुपयोग करू या. सूर्यनारायण एकदा या भूतळावर अवतरला की चैतन्याचे सगुण साकार आविष्कार या भूतलावर चराचरात लवथवताना दिसतात.
पाखरांचा किलबिलाट काय सांगतो आपल्याला? .. काय सांगत असतात ही पाखरे अनाकलणीय भाषेतून?.. कुठे लपून बसलीय ती सुरेल तालात चिवचिवणारी नाजुक मैना? ..ही खारूताई आपल्या मिशा पुसत सकाळी सकाळीच काय कुरतडते आहे आणि कसली धावपळ चालली आहे तिची? गाय हंबरते आहे गोठयातून आणि ते पाहा तिचे वासरू शेपूट उंचावून उंडरते आहे.. बाबानी या वासराला मोकळे सोडले वाटते.. आता बाबा गाईच्या दुधाची गरम गरम धार काढतील.. अजूनही गाय हंबरते आहे..
वासरू तिच्या कासेला ढुशी देणार.. तेव्हाच ती पान्हा सोडणार.. हा हवाहवासा घुंगरांचा कर्णमधुर आवाज.. नक्कीच आबानी बैलगाडी जुंपली. देवळातल्या घंटानादाने परिसर भारून गेलाय. विठ्ठलाच्या देवळात सकाळची आरती सुरू झाली.. आरतीचा आवाज कृष्णा काकांचा आहे. गुरे वासरे आता माळावर चरतायत.. गुराखी काळया खडकावर घोंगडी अंथरून बसलाय, कोवळया रूपेरी किरणात..
पोरीबाळी नदीवरून भरले हांडे घेऊन रमत गमत घराकडे परतल्यात. प्रात:काळच्या रूपेरी किरणांचा सडा अंगणभर पसरून आला त्याने आपले हातपाय सर्वदूर पसरलेत.. झाडांच्या पानांतून झिरपणारी रूपेरी सिताचवरी झाडाखाली नाचते आहे. उबदार नाजुक सुकुमार वा-याची झुळुक मनाला सुखावते आहे. सारेच वास्तव्य बोलके आणि मंगलमय मनाला पावित्र्याच्या मंदिरात घेऊन जाणारे.. सदैव हवेहवेसे वाटणारे!

Wednesday, March 4, 2015

खंडूशेणफड   दांडगे हे अंध जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका व पारसशाहू राजा येथील राहणारे वृद्ध आपली पत्नी कौसाबाई शेण फड हिला   आपली आधाराची काठी बनवून गावोगावी फिरून भिक मागून आपली उपजीविका चालवत आहे . दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात चितळ वेढा गावात ग्रामस्थांच्या भेटीला ते येत असतात . अंध व अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. त्यामुळे समाजाच्या मूळ प्रवाहात अपंग वंचित राहतात.मात्र येथील ग्रामस्थ आपले संस्कार जपत या अंध खंडू व त्याच्या पत्नीला नातेवाईक समजून गोड जेवण देऊन त्यांचा पाहुणचार करतात . गेली एक तपापासून या गावाच्या भेटीला मजल दरमजल करीत ते येतात .
दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्‍यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते. आयुष्य हे जर गाणं असेल, तर दृष्टी हा त्या गाण्याचा ताल आहे, ठेका आहे, ज्यांच्याशिवाय हे गाणं अतिशय उत्तम गायकाने गायलं असून सुध्दा बेचव व बेरंगी ठरू शकतं. काही व्यक्तींना ही भेट देण्यात निसर्गच कमी पडतो, तर काहींना ही शक्ती गंभीर अपघातामुळे, इजेमुळे किंवा आजारामुळे गमवावी लागते. आयुष्यामधील प्रत्येक क्षण ही त्यांच्यासाठी एक लढाई असते, ज्यात त्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी बघण्याची सुध्दा संधी मिळत नाही. लहानपणी आंधळी-कोशिंबीर खेळताना, जी दहा मिनीटे आपण इतरांना पकडण्यासाठी केविलवाणी खटपट करतो, हेच त्यांच्यासाठीअख्ख आयुष्य असतं. आपण त्यांच्या दुःखाची खोली मोजू शकतच नाही, हे खरं असलं तरी अशा अनेक व्यक्ती व संख्या आहेत ज्या त्यांना हरप्रकारची मदत करण्यासाठी, व त्यांच्या आतला प्रकाश पुन्हा उजवण्यासाठी कार्यरत आहेत.तेच कार्य आध्यत्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे चितळ वेढा गाव करीत आहे मारुती अर्जुन आरोटे ,  सरपंच सागर आरोटे , सेवानिवृत्त शिक्षक उमाजी भा गवत गुरुजी ,रामनाथ आरोटे ,व ग्रामस्थ कार्य करतात . खंडू ला मुले  सांभाळत नाही मात्र कौसाबाई  त्यांची चांगली काळजी घेतात . दारिद्र्य रेषा खाली कार्ड नसल्याने कोणतीच सवलतत्यांना  मिळत  नाही घरी शेतीवाडी आहे,  पण मुले  करतात त्याचा या दोन वृद्धाना फायदा नाही . त्यामुळे  मिळेल ती भिक पदरात पाडून आपले गुजराण करणारे खंडू व कौसाबाई आलिया भोगासी आसवे सादर म्हणून खुश आहे  
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला अर्पण केलेल्या संविधानात प्रत्येक व्यक्तीला अन्न, पाणी, निवारा या गोष्टीला घटनात्मक महत्व दिले आहे. त्याला अनुसरुन राज्यकर्ते कामही करतात. घटनेचा उदार दृष्टीकोन ठेऊन सामाजिक कल्याणाच्या योजनेचा विस्तार करुन विविध लोकपयोगी योजना राबविल्या जातात.