Friday, August 7, 2020

राणभाजी

*कळसुबाई हरिश्चंद्रगड,रतनगड परिसरातील रानभाज्या*
 पावसाळ्यात पाऊस पडला की रोहीणीच्या येळेला मातीतुन कितीकं रानवेलींच जीवन उमलुन वर येते.
काही झाडाझुडपांची तर काही वेलींची पानं, फुलं,खोड, मुळ, देठ, कोंब खाले जाते.
आणि ह्या सगळा आपलेली नैसर्गिकपणे आणि कोणत्याही खताशिवाय आणि बी पेरावे लागत नसल्याने किंवा कोणतीही मेहनत करावी लागत नाही.
उदा-चाईचा देट,चाईचामोहर,करटुली,गोमेटी,गुळवेल,आंबटवेल,कुरडू,तेराआळवड,टाकळ्याची पानं दिव्याची भाजी,बडद्याची भाजी,कोळुचीभाजी,फांदेची भाजी भोकरीच्या पानांची भाजी शिवाय कवळ्या बोखांची भाजी,लोतीची भाजी,घायपाताच्या फुलांची भाजी,बहाव्याच्या फुलांची भाजी,आघाड्याच्या पानांची भाजी,आणवा,करंजकंदाची भाजी,पंधाचेकंद,सुरणकंद,कवदरची भाजी,खरपुडी,सायरीच्या सायरधोड्याची भाजी,वाघाटीची भाजी,कच्च्या आणि कवळ्या आळवांचीभाजी,(कच्या करवंदाची चवदार कढी,चटणी,कच्च्या करवंदांचे लोणचं जंगली आणि गावरान आंब्याचे लोणचं,भोकरीच्या कवळ्या पानांचे मुटके,फळांची भाजी,मोहट्यांच्या फळांची भाजी,मोहाच्या फुलांची खीर,पुरणात हलकासा वापर) चिलाचीभाजी,काटमाठाची,तांदुळणेची,कोंबडेचीभाजी(अशा फक्त रानभाज्यांची यादी 100पेक्षा जास्त होईल)या रानभाज्यावर कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही किंवा खत औषध लागत नाही.हे आपल्याला नैसर्गिक रित्या रानावनात शेताच्या बांधावर तीनही ऋतुत मिळत असल्याने यासचं सेंद्रीय शेती असे म्हणता येईल.
बऱ्याच ठिकाणी काही मान्यवर(शेतीतज्ञ)प्रश्न विचारतात की तुम्ही आजिबातही खत औषध वापरत नाही हे खरे आहे काय? तेव्हा ममताबाई किंवा आम्ही महिला हसत हसत सांगतो की करवंदाच्या जाळी किंवा मोहाच्या,भोकराच्या झाडाला कस खत घालणार ते तर जंगलात आपोआपच वाडते.आणि पुढे सांगाव लागत की "जर तुम्ही किंवा आम्ही या रानमेव्याची विशेषता जंगली रानवेलींची,रानकंदांची छेडछाड केली किंवा त्यांच्या बिया लावण्याचा प्रयत्न केला तर त्या रुजणार नाहीत आणि रुजल्यानंतर रासायनिकखत दिले तर त्या अपेक्षित उत्पन्न देणार नाहीत.ते जंगलात वाढतात त्यांना जंगलातच वाढू द्या,म्हणुन आमी आदिवासी लोकं ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक असेल तेवडेच घेतो फार तर एखाद्या वेलीची ठराविक वेळी आणि ठराविक काळातच भाजी खाल्ली जाते,तीही एकदोन वेळसच.
जसे-बडदा,दिवा ही भाजी कोवळी पानं असतांनाच खाल्ली जाते.टाकळा(तरोटा)ही भाजी उगवल्यानंतर आट दिवसाच्या आतच खाण्याजोगी असते.तसेच चाईचा देट पानावर येण्या अगोदरच खाण्या योग्य असतो.
 जंगलात ठराविक काळात मिळणाऱ्या रानभाज्यांचे कंदवर्गीय,वेलवर्गीय,झुडुपवर्गीय,झाडवर्गीय,फळवर्गीय असे प्रकार आहेत.
रानातील सगळ्याच बिनखताच्या रानभाज्या अगुदर पाण्यात शिजवून(उमवून)घेतल्या जातात नंतर पिळुन भाजी करतात.कारण ह्या बहुतेक रानभाज्या पचनास जड असतात.ह्या रानभाज्या खुरासणेच्या थोडेश्या तेलातही चवदार लागतात.
आमच्या जेवनात अजूनही खुरासण्याच्या/शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो.
वाढत्या शहरीकरणामुळं रानातील हा रानमेवा अतिदुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे,म्हणुनच या रानमेव्याची/रानभाज्यांची चव चाखण्या बरोबरच त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही स्वतःपासुन सुरुवात केली आहे.आम्ही कळसुबाई परिसरातील महीलांनी बायफसंस्थेच्या सहकार्याने परसबागेची चळवळ सुरु केली आहे.त्या परसबागेची दखल बायफसंस्थेने घेऊन परसबागेच्या चळवळीतील महिलांचे काम राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे.
माझ्या सासुबाईं व ममताबाई भांगरे ह्यांचे बालपण माहेर,सासर ग्रामिण भागात बाडगीच्या माची परिसरातील निसर्ग संपन्न आणिआदिवासी बहुल भागात राहिल्याने येथील निसर्गातील वनसंपदेची अचूक माहिती सांगतात.
भविष्यात पुढील पिढीला ह्या रानमेव्याची विसरपडू नये यासाठी आम्ही सासू सुना जुजबी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
जय राघोजी
जुजबी शब्दांकन -सौ.जिजाबाई मधुकर भांगरे.
रानभाज्या संकलक-सौ. ममताबाई भांगरे 
देवगाव ता.अकोले जि अहमदनगर.सशांताराम बापू काळे

No comments:

Post a Comment