Friday, October 10, 2025

पिचड साहेब

अकोले(शांताराम काळे )अकोले तालुक्याची व राजूर गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात ओळख करून देणाऱ्या महामानव वंदनीय मधुकरराव पिचड यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला ,तालुक्यात जलाशयाची निर्मिती करून जलनायक म्हणून आपली ओळख करताना तालुक्यासह उत्तर नगर जिल्हा सुजलाम सुफलाम बनविला.सभापती पदापासून राज्यात मंत्री,प्रदेशाध्यक्ष,विरोधी पक्षनेते,या पदाना न्याय देऊन आदिवासी उपेक्षित समाजाला स्वतंत्र आर्थिक बजेट करून न्याय दिला तर तालुक्याला नवसंजीवनी देणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.त्यांनी तालुक्याचे,राज्याचे नेतृत्व करताना आपले कुटुंब देखील एकत्रित ठेवून आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांनादेखील सामाजिक व राजकीय कामाची गोडी लावली ,नातवंडे ,भाऊ ,मुले,सुना असा त्यांचा परिवार माजी आमदार वैभव पिचड यांचे आपल्या वडीलांबद्दल दैनिक सकाळ ने त्यांच्या विषयी माहिती करून घेतली ' वंदनीय पिचड साहेबांचा संस्काराचा ठेवा .. ' --------------------------------------------- मा. आ. वैभव पिचड माजी आमदार वैभव पिचड म्हणाले माझे वडील वंदनीय पिचड साहेबांकडून राजकीय धड्याशिवाय खऱ्या अर्थाने पारिवारिक स्नेह कसा टिकवावा आणि एकत्र कुटुंब पद्धतीतील जिव्हाळा सौहार्द शिकायला मिळाले ही मोठी उपलब्धी . शिस्तप्रियता, कामाचा पाठपुरावा तसेच पूर्ततेबाबत दक्षता या बाबी अधिक शिकायला मिळाल्या . वंदनीय साहेबांचा स्वभाव सडेतोड, स्पष्टवक्तेपणाचा आणि मुख्य म्हणजे शिस्तबद्धता तसेच माणूसपण केंद्रिभूत ठेऊन आलेल्या माणसाचा आदर टिकवून वागायचे हा त्यांचा लक्षणीय बाणा तालुक्यासह राज्याला स्मरणात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ही जणू कसोटीची संधी आहे असे समजून साहेब धैर्याने आणि कमालीच्या शांतपणे वागत, निर्णय घेत असल्याचे मी कायम अनुभवले आहे.. पाहिले आहे . प्रभावी निर्णयक्षमता हा तर वंदनीय साहेबांचा विशेष लौकीक ठरला . निर्णय घेताना संबंधित माणसाचा यथोचित सन्मान , आदर राखून मात्र अंतिमतः तडजोड न करता तात्विक भान टिकवून ते निर्णय घेत असत . साहेबांची धार्मिक मते, जाणीव फार म्हणजे फारच सौजन्यशील पद्धतीची, आदराची होती . धार्मिक सलोखा राखण्याबाबत कायम आग्रही भूमिका घेणाऱ्या साहेबांनी सातत्याने सलोखा टिकवला हे त्यांचे वैशिष्ट्य सर्वांना ज्ञात आहे . निवडणूकीचा निकाल अथवा मनाविरुद्ध काही घडले तरी कमालीच्या स्थितप्रज्ञ भावनेतून साहेब संयमी राहिले . आजारपणातील अखेरच्या काळात वंदनीय साहेबांनी तालुक्यातील जनसामान्यांच्या हिताबाबत कळवळ्याने विचारपूस केली हा माझ्या मनावर कोरला गेलेला प्रसंग अविस्मरणीय ठरलाय. एक मुद्दा मला आवर्जून लक्षणीय वाटला साहेबांच्या संदर्भात.. तो म्हणजे त्यांनी निर्णायक प्रसंगी मला एखादा सल्ला दिला आणि माझ्याकडून काही वेगळी भूमिका प्रासंगिक कारणाने घेतली गेली तरीही वंदनीय साहेब कधी संतापले नाहीत अथवा तुसडेपणाने नाराजी कधीच व्यक्त केली नाही .. साहेबांची वाचन क्षेत्रातली रसिकता मात्र व्यासंगी ठरली . त्यांचे वाचन चोखंदळ होते. अफाट होते . राजकीय व्यापात, विलक्षण व्यस्त दिनक्रमातही वेळ राखून कायम साहेबांचे वाचन असायचे. वाचनाची त्यांची अभिरुची फारच संपन्न राहिली . विशेषतः परिवर्तनवादी साहित्य आणि वैचारिक लेखन हा आवडीचा भाग होता . इंग्लिश भाषेतील साहित्याच्या वाचनाबाबत अधिक कल राहिला . त्यांचे पदवीचे शिक्षणच मुळी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले . विख्यात स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय प्रा. ग. प्र. प्रधान मास्तरांचे विद्यार्थी होते साहेब . याशिवाय सकाळची पायी फेरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. साहेबांनी घरातील सर्वांचेच भावनिक पर्यावरण खऱ्या अर्थाने समृद्ध ठेवले . नात्यातील भावबंध आणि मायेचा ओलावा कटाक्षाने जपला. माझी भावंडे, आई आणि नातवांना जी मायामतेची पाखर मनापासून धरायची असते त्याबाबत त्यांनी कायमच राजकारण - समाजकारणात व्यग्र असताना देखील आपुलकीची साथ दिली . नातवांचे पुरेसे लाड केले . भावनिक कोमलता , संदर्भ जपले . सुखात असो वा दु:खात कधीही, केंव्हाही वंदनीय साहेबांनी जबाबदारी न टाळता अथवा कुणावरही न विसंबून राहता कौटुंबिक सह्रदयता जाणीवेतून राखली आणि पारिवारिक स्नेह कसोशीने सांभाळला. वृद्धिंगत केला हे त्यांचे ऋण मला कधीच विसरता येणे शक्य नाही . कौटुंबिक जिव्हाळ्याशिवाय वंदनीय साहेबांनी आपला समाज तसेच तालुक्यातील जनसामान्यांचे हित सौहार्द या बाबींना प्राधान्य दिले . घरी भेटीला येणाऱ्या प्रत्येक माणसाची अगत्याने विचारपूस तसेच अडीअडचणींचा निपटारा करणे यासंदर्भात काळजातली नाती सांभाळली. तालुक्यातील , मतदार संघातील अवघ्या माणसांविषयीची फिकीर आणि हितसंबंध जपण्यासाठी वंदनीय साहेबांनी आपपर भेदभाव केला नाही की जबाबदारी टाळली नाही . ' ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती ' या न्यायाने साहेबांनी समाजहिताचा कळवळा सिद्ध केला, हे अवघ्या तालुक्यातील जनतेला ज्ञात आहे , ठाऊक आहे . सामाजिक, राजकीय वाटचालीत प्रसंगी प्रतिकूल वातावरणातही समाज हिताचे निर्णय घेताना सातत्याने साहेबांनी जनसामान्यांच्या काळजाची स्पंदने धडधडत ठेवली. तालुक्याचे हक्काचे पाणी असो अथवा अगस्ती साखर कारखान्याची मुहूर्तमेढ आणि पुढील समस्यांतून मार्ग काढणे किंवा शिक्षण संस्थांचे अनुदान तसेच मान्यतेसाठी प्रयत्न आणि जलसंधारण प्रकल्प, समस्यांच्या विळख्यातील लिफ्ट योजना, आश्रम शाळांचे जाळे मार्गी लावले अशा एक ना अनेक कामगिरीबाबत वंदनीय साहेबांनी कायम आणि कायमच जीवाचे अक्षरशः रान करुन समाजहिताचा प्रपंच जपला. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धन, वन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत?  ' घार हिंडते आकाशी , चित्त तिचे पिलापाशी ' या मायाममतेच्या तत्वाने साहेबांनी परिवार आणि समाजातील, तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या , समजून उमजून सदैव काळजी वाहिली. ध्येयवादी राहिले . कर्तव्य निष्ठेने काम केले . दूध व्यवसायातील धवल क्रांती, प्रवरेच्या पाण्याचे नियोजन आणि फेरवाटप , निळवंडे धरण कसोशीने मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच घेतलेली मेहनत अशा अधोरेखित कर्तृत्वाचा लेखाजोखा साहेबांच्या नांवे लखलखीत आहे . वडील म्हणून साहेबांच्या कार्याचा असा हा विशाल पट आम्हाला सदैव दीपस्तंभासारखा प्रेरणादायी ठरेल . दिशादर्शक ठरेल -------------------------------------------- मा. आ. वैभव पिचड शब्दांकन , शांताराम काळे

No comments:

Post a Comment