Monday, April 25, 2011

कहाणी अंधारलेल्या आणि तहानलेल्या गावांची ..

शिकण्याची जिद्द होती पण, शिकता येत नव्हतं.. तहानेनं जीव व्याकूळ होत होता पण लगेच पाणी मिळत नव्हतं.. आरोग्याची हेळसांड होत होती पण जंगल तुडवून दवाखान्यात पोहोचेपर्यंत जीव जात होता.. आयुष्यात याच समस्या कायम राहतील की काय ही भीती होती. मात्र, आता हळूहळू विश्वास वाटायला लागला की, आम्हीही सर्वसामान्यासारखं जगू शकतो.
शहरांपासून कोसो दूर अतिदुर्गम भागात पहाडावर आयुष्य कंठणाऱ्या आदिवासी कोलामांच्या पाडय़ाला भेट दिली, तेव्हा मतांचा जोगवा मागणाऱ्या राज्यकर्त्यांवर हसावे की रडावे हेच कळत नव्हते.
यवतमाळ जिल्यातील केळापूर तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीत येणारी माकोडा ही २२-२३ घरांची आणि झरी तालुक्यातील वळपोल ही कोलामांची वस्ती गेल्या कित्येक दशकांपासून अंधारात आहे. कोलामांच्या या पाडय़ाने कधी वीज बघितली नाही, रस्ता बघितला नाही पण, या परिस्थितीतही ते जगत आहेत. जंगलाची वाट तुडवत आणि मध्येच येणारे पहाड ओलांडल्यावर   वळपोलच्या कोलाम वाडीत प्रवेश होतो. माणसं या परिस्थितीतही जगू शकतात, असा प्रश्न येथे पाय ठेवल्यानंतर पडतो. पिण्याच्या पाण्यासाठी कोलाम डोक्यावर तीन-तीन घागरी घेऊन अडीच किलोमीटरची पहाडी वाट तुडवत जातात. आबालवृद्ध अशा सर्वानाच पाण्यासाठी अक्षरश: जीवाचे रान करावे लागते पण, त्यांच्या चेहऱ्यावर निराशेची साधी झलकसुद्धा दिसत नाही. या गावातील शिक्षणाचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. कारण गावात शाळाच नाही. दुसऱ्या गावात जाऊन शिकायचे तर चार-पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. कोलाम पाडय़ातील जो एक टक्का वर्ग शिकला आहे त्याचे शिक्षणसुद्धा चौथ्यावर्गापर्यंतच आहे. दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून पोट भरणारा हा वर्ग जेव्हा स्वत: काही करायला जातो तेव्हा वनविभाग आडवा येतो. जंगलात राहात असल्यामुळे तेथील बांबू तोडून त्याच्या ताटय़ा तयार करणारे कोलाम बाजारात जाऊन ते विकू शकत नाही कारण वनविभागाचा कायदा त्यांना अडसर ठरतो. मोह, चारोळय़ा, लाख, डिंक यासाठी त्यांना वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. या गावातील समस्यांची जंत्री कधी संपेल असे वाटत नाही पण, त्याविषयी त्यांना अजिबात तक्रार नाही.
माकोडा या गावाच्या आजूबाजूला दोन किलोमीटपर्यंत वीज आहे पण, या गावाने कधी वीज बघितली नाही. कोलामांचा हा पाडा मुख्य रस्त्यापासून फार दूर नाही तरीही या पोडय़ात शिरताना जंगलातूनच जावे लागते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता झाला पण, त्याला रस्ता म्हणायचे का, हा प्रश्न आहे. शाळा आहे ती केवळ चौथ्या वर्गापर्यंत. दोन हातपंप बसवण्यासाठी कधीकाळी या कोलामपाडय़ात अधिकारी आले पण, हे हातपंप सुरू आहेत की नाही याकडे त्यांनी नंतर वळूनही बघितले नाही. एका विहिरीवर कोलाम पाणी भरतात पण, गेल्यावर्षी ही विहीरसुद्धा आटली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून कुठेही जायचे असेल तर हे कोलाम पायीच जंगलाची वाट तुडवत जातात. आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे तर बाहेरगावाहून वाहन आणावे लागते पण, ते सुद्धा रस्त्याअभावी आजारी माणसापर्यंत पोहचू शकत नाही. कापूस आणि ज्वारीच्या शेतीवर जगणारे ही माणसे वीज आल्यानंतर मात्र अत्यंत आनंदीत आहे. आता साप, विंचवाची भीती वाटणार नाही, असे ७० वर्षीय राघूजी टेकाम यांनी सांगितले. गावातील सर्वात जास्त शिकलेल्या सुनील मेश्रामची प्रतिक्रिया म्हणजे, ‘दिव्यात अभ्यास करताना डोळय़ाची आग होत होती. दिलेला गृहपाठ करता येत नव्हता पण, आता वीज आली आणि अभ्यासाचा मार्ग सुकर झाला’. महिन्याला १०० ते १५० रूपयाचे रॉकेल लागत होते आता त्याची बचत झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर होता.
कोलामांच्या पाडय़ातील एक आश्चर्य म्हणजे मोबाईल फोन. या संपूर्ण गावात एक मोबाईल फोन आणि बाजूच्या वीज असलेल्या गावात त्याला चार्ज करून आणायचे. फोन दोन दिवस चार्ज असावा म्हणून करमणुकीसाठी एफएम ऐकायचा पण, आता हेच लोक तासन्तास मोबाईलवर गाणे ऐकताना दिसतात. गावात वीज आल्यामुळे साप, विंचवाच्या भीतीने ७ वाजता अंथरुणावर पडणारी ही मंडळी आता रात्री ११ वाजेपर्यंत जागी असतात. पुंगी आणि पाऊल या दोन वाद्याच्या साथीने ‘येनदातून’ हे नृत्य आदिवासी कोलाम आनंदाच्या प्रसंगी हमखास सादर करतात. स्त्री-पुरुष असा भेद न करता सारेच या नृत्यात सहभागी होतात. या दोन्ही गावातील सुमारे ९५ टक्के लोकांनी यवतमाळ शहर पाहिले नाही.
आमदार खासदारांची नावे त्यांना माहिती नाही. या गावात अधिकारी कधी येतच नाही आणि राज्यकर्ते येतात ते मतांचा जोगवा मागायला पण, तक्रारीचा सूर त्यांच्या तोंडून कधी ऐकायला मिळत नाही. अशा या दोन्ही कोलाम पाडय़ात आता वीज आली आहे. पाठोपाठ इतरही सोयी येतील, या आशेवर या पाडय़ातील कोलाम आहेत


निर्दयी मातेने टाकून दिलेल्या मुलास ‘ममत्वा’मुळे जीवदान!Bookmark and SharePrintE-mail
राजूर, २४ एप्रिल/वार्ताहर
माता न तू वैरिणी, तसेच देव तारी त्याला कोण मारी ही सर्वपरिचित म्हण आहे. या म्हणींचा प्रत्यय आज येथे लहान बाळाबाबत आला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक-दीड महिन्याच्या या बालकाला त्याची निर्दयी माता येथील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठेवून निघून गेली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यावर पत्रकार शांताराम काळे व मंदिर ट्रस्टने या बाबत राजूर पोलिसांत खबर दिली. ग्रामीण रूग्णालयात आजच प्रसुती झालेल्या सहृदयी दोन महिलांनी आपले दूध दिल्याने या मुलास जीवदान मिळाले. नगरच्या स्नेहालय संस्थेकडे बाळास सुपूर्द करण्यात आले.
पहाटेच्या वेळी अंधाराचा फायदा घेत एका महिलेने शालीमध्ये गुंडाळून या मुलास मंदिराच्या पायरीवर ठेवून ती निघून गेली. गौरवर्ण, गोल चेहरा असलेले हे मूल सकाळी मंदिरात काकडआरतीस आलेल्या जगन्नाथ शिंदे यांनी पाहिले. त्यांनी मंदिराचे ट्रस्टी विद्याधर कवडे, भीमाशंकर कवडे यांना कळविले. त्यांनी पत्रकार शांताराम काळे यांच्या लक्षात ही बाब आणली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दूरध्वनी करून माहिती दिली. राजूर पोलिसांनी या मुलास ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
भूक लागल्याने हे मूल रडू लागले. रूग्णालयात दोन महिलांची प्रसुती झाली. त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आपले दूध पेल्यात काढून दिले. महिला कॉन्स्टेबल मीरा दांगडे यांनी चमच्याने ते मुलास पाजले. त्यानंतर हे मूल शांत झाले. जन्मदाती वैरी झाली. परक्यांनी मातेचे ममत्व दाखविले आणि खाकी वर्दीतूनही मायेची उब मिळाल्याने हे मूल शांत झाले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. नगरच्या स्नेहालय संस्थेशी राजूर पोलीस व पत्रकारांनी संपर्क साधला. स्नेहालयने गाडी पाठवून मुलाच्या संगोपनाची व पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली व मुलास नगरला घेऊन गेले. काही वेळाने गावातील दोन जोडपी या मुलास दत्तक घेण्यास आली होती. मात्र, तोपर्यंत मूल नगरला रवाना झाले होते. पोलीस त्या निर्दयी महिलेचा शोध करीत आहेत.




राजूर, २५ एप्रिल/वार्ताहर
सध्याच्या शिक्षण पद्धतीतील उणिवांवर नेमकेपणाने बोट ठेवत, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ामुळे (२००५) यावर मात करणे कसे शक्य आहे, यावर मर्मग्राही भाष्य करीत वेतानासाठी नव्हे तर आनंदासाठी काम करण्याचा संदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक नंद कुमार यांनी दिला.
येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान व दादासाहेब रूपवते फाऊंडेशन यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन राजूर येथील एम. एन. देशमुख महाविद्यालयात केले होते. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी शिक्षकांशी संवाद साधला.
नंद कु मार यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न उपस्थित केले. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. बाहेरून तज्ज्ञ बोलावण्याची गरज नाही, तर प्रत्येक शिक्षक तज्ज्ञ बनू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने एखादा विषय निवडावा. त्याचा खोल अभ्यास करावा. व्यासंग वाढवावा. सकारात्मक विचार करावा. प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाचा स्त्रोत असतो. त्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांकडे पाहावे. हाच ज्ञानरचनावादाचा पाया आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई चौहान यांनी शिक्षण व बाल हक्क यावर मार्गदर्शन केले. बालकांच्या हक्कांची जपणूक करण्यावर त्यांनी भर दिला. राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वरिष्ठ सल्लागार गीता महाशब्दे यांनी कृतीशीलतेतून गणित शिकवणे कसे सोपे व सुलभ होते याचे प्रात्यक्षिकच सहभागी शिक्षकांकडून करून घेतले.
प्रा. शाहीर तुळशीराम जाधव यांनी गिते सादर केली. समिक्षा संध्या मिलिंद यांनी मुलींचे शिक्षण या विषयावर एकपात्री नाटिका सादर केली. उद्घाटनाच्या सत्रात बोलताना बहुजन शिक्षक संघाचे विश्वस्त प्रेमानंद रूपवते यांनी शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी कार्यशाळा, शिबिरे यांची गरज असल्याचे सांगितले. अकोले तालुका शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य टी. एन. कानवडे यांचीही भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर, उपशिक्षणाधिकारी उमेश डोंगरे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी कार्यशाळेस भेट दिली.
उत्कर्षां रूपवते, भाऊसाहेब चासकर, भाऊसाहेब कासार, अनिल पवार, अरूण जाधव, दत्तात्रय शेळके, नितीन नेहे, बाळासाहेब शेळके, भाऊसाहेब हासे, राजकमल नवले, अनुराधा नेहे, प्रकाश पारखे, मंजुषा काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.