Sunday, November 29, 2020

कर्तव्यभावनेचा प्रवास*

*ब्लॉग*
*कर्तव्यभावनेचा प्रवास*

*चांगले शिक्षक हेच शिक्षण संस्थाचे भूषण असते. कारण ते जे काही पेरणार असतात आणि त्यातून समाजासाठी जे काही उगवणार असते त्यावर शिक्षण संस्थाचा ब्रॅंड ठरलेला असतो. मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणांच्या होणा-या जाहिराती पाहिल्या, की शिक्षणातून काय हरवत चालले आहे हे सहजपण लक्षात येते. शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...*

*कर्तव्यभावनेचा प्रवास*

Anant Patil
Published on : 
30 Nov, 2020 , 11:15 am

परवा सहजपणे वर्तमानपत्रातून आलेली एका शाळेची जाहिरात हाती पडली..शाळेचे मैदान,उंच इमारती,शाळा व वर्गात सी.सी.टी.व्हीची उपलब्धता, जी.पी.एस.ट्रॅकिंगसह बससेवा,संगणक प्रयोगशाळेची उपलब्धता असं काही जाहिरातीत लिहिलेले होते. यात शाळा म्हणून समाजाने निर्माण केलेल्या या संस्थेकडून जे काही अपेक्षित केले आहे त्या अपेक्षांबददल तर काहिही नोंदविलेले नव्हते.

शिक्षणातून माणूस घडवायचा असतो. उत्तम नागरिक निर्माण करायचे असतात. समाजासाठी उत्तम साहित्यिक, कलावंत, अधिकारी ,कामगार, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, क्रीडापटू , शिक्षक, डॉक्टर, व्यावसाय़िक हवे असतात त्याची निर्मिती हेही शिक्षणाचे उद्दीष्ट असते. त्यासाठी शिक्षणात काय असायला हवे.. त्या दृष्टीने शाळेने केलेले प्रयत्न महत्वपूर्ण असतात मात्र मुळ ध्येयालाच फाटा देत केवळ देखाव्याचा उल्लेख. विद्यार्थी घडविण्यासाठी होणारे प्रयत्न, त्यासाठीची प्रक्रिया नमूद नाही.

शाळांची उंची आता केवळ उंच उंच इमारती आणि भौतिक सुविधांनी मोजली जाणार असेल ,तर समाजाची उंची हरवत चालली आहे का ? असा प्रश्न पडतो. इमर्सन नावांचा विचारवंत लिहितो जेव्हा छोटया माणंसाच्या सावल्या मोठया पडू लागतात तेव्हा समाजाचा -हास जवळ आला आहे असे समजावे. त्या प्रमाणे जेव्हा मोठया व समाज घडविणा-या संस्थांना आपल्या ध्येय आणि उद्दीष्टाशिवाय प्रवाहपतित होऊन जाहिराती करू लागतात आणि दर्शनीय असलेल्या संस्था जेव्हा प्रदर्शिय ठरू लागतात तेव्हा समाजावे समाजाचा प्रवास उलटया दिशेने सुरू झाला आहे.

खरेतर उत्तमतेची कधीच जाहिरात करावी लागत नाही. अनुभव हीच सिध्दी असते. शिक्षण ही सामाजिक संस्था आहे. तीच्याव्दारे माणूस निर्माण होत असतो. प्रत्येक बालक हा भिन्न आहे. त्याचा आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक स्तर भिन्न आहे. त्यामुळे त्याच्या जडणघडणीकरीता पुन्हा वेगळे प्रयत्न असतात. बालकांला जाणून, समजून शिक्षण सुरू असते. त्यासाठी निश्चित अशी एकेरी आणि तीच तीच प्रकिया असत नाही. शिक्षणात गुणवत्तेचे मनुष्यबळ महत्वाचे असते. ते मनुष्यबळ किती परिणामकारक व प्रभावी काम करते त्यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे मुलांवर प्रभाव पडत असतो.अशी अभ्यासू माणंस आणि मूळ ध्येयाने काम करणारी माणंस कधीच जाहिरातीवर भर देत नाही.

जाहिरात खर्‍या गुणवत्तेसाठी करावी लागतच नाही. गुणवत्ता ही दर्शनिय असते ती कधीच प्रदर्शनिय असत नाही. शिक्षण,शिक्षक आणि शाळा समाजासाठी नेहमीच दर्शनीय राहिल्या आहेत. शेकडो वर्षानंतर समाजाच्या मुखात नालंदा, तक्षशीला, जग्गादाला, सोमपूर, ओदान्तपूर ही विद्यापीठे येतात. कारण तेथील शिक्षण प्रक्रिया व तेथील गुणवत्तेची माणंस हिच तेथील ओळख बनली आहे.आज अशी माणस हरवत चालली आहे.

माणस हरवली की ध्येयाचा प्रवास थांबतो. मग गुणवत्तेची पाऊलवाट हरवली जाते आणि मग ध्येयहिन पाऊलवाटेचा प्रवास अधोरेखित करण्यासाठी यंत्राची मदत घ्यावी लागते. माणंसाची उंची गमावणे झाली , की इमारतीच्या उंची महत्वाची वाटू लागते. जेव्हा आपण ज्या मार्गाने जाण्यासाठीचा रस्ता निवडला आहे तो मनापासून निवडला असेल तर त्यावर अंतकरणापासून प्रेम असते.त्यामुळे तो मार्ग कठिण असला तरी आणि समाजामान्य नसला तरी चालणे घडते आणि समाधान व य़शाचे शिखर सहज पादाक्रांत करता येते. ते चालत राहाणे घडत राहाते.

आपण जेव्हा त्यावरती प्रेम करीत राहातो तेव्हा तो मार्ग प्रसिध्दीचा आहे की नाही ? यशाचा आहे की नाही ? याचा विचार केला जात नाही.आपणाला जेव्हा प्रसिध्दीस यावे असे वाटते, प्रसिध्दीसाठी काही करावे वाटते, यशासाठी काही पण करण्याची वृती निर्माण होते तेव्हा हिणपणाचे व मूर्खपणाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.कृष्णमूर्ती यांनी हे केलेले विधान माणंसाला आपली मूल्य दर्शविण्यासाठी मदत करणारे ठरते. काही करून आपण प्रसिध्दीच्या झोतात राहाण्याचा प्रयत्न म्हणजे मूर्खपणाच आहे.

आपण केलेले काम हे देखील प्रदर्शन करण्याची वृत्तीला काय म्हणावे.. ? अनेकदा झोतात राहाणे..आणि समाजात चमकत राहाण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे केवळ आणि केवळ मूर्खपणाचे लक्षण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आणि संस्था आपण जे काही काम करतो आहोत, ज्या दिशेने प्रवास सुरू ठेवण्याच्या प्रयत्न अपेक्षित असतो त्या दिशेने प्रवास करणे शक्य नाही किवा त्या कामाबददल तळमळ नसते. तेव्हा प्रसिध्दीच्या खोटया मार्गाने स्वतःचे नसलेले वैभव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असतो.

शिक्षणाने केवळ यशावर प्रेम करायला शिकवायचे नसते..पण सध्या तर आपण य़शाचा ध्यास घेऊन चालत आहोत.पण आपण जे काही करीत आहोत त्यावरती प्रेम करायला वर्तमानातील शिक्षण शिकवत नाही.आपण जे काही करतो त्यापेक्षा आपल्याला अंतिम प्रयत्नानंतर मिळणा-या य़शावरती अधिक प्रेम असते. त्यामुळे करावयाच्या कष्टावरती प्रेम करणे राहून जाते आणि मग तो मार्ग न चालताही खोटया प्रसिध्दीच्या दिशेने प्रवास करावा लागतो.जे माझे नाही ते हरवले की आपल्याला अशा खोटया प्रतिष्ठेसाठी लढावे लागते.आपल्याला आपल्या कर्तव्यापेक्षा त्या कर्तव्याच्या फळाचेच आकर्षण अधिक वाटू लागते.

शिक्षण म्हणजे कर्तव्यभावनेचा प्रवास आहे.राष्ट्र व समाज निर्मितीचे काम आहे.येथे झोकून काम अपेक्षित आहे.स्वतःला गाढून घेणे असते.येथे तर चांगल्या कामाची जाहिरात नसते , तर विद्यार्थ्यांच्या हदयावर कोरणे असते.उत्तम व अभ्यासपूर्ण अध्यापनाने शिक्षकाला वर्तमानातील देखाव्यात स्थान मिळणार नाही , पण ते शिक्षक विद्यार्थ्यांच्या हदयावरती जीवनभर कोरले गेलेले असतात. एक शिक्षक अंत्यत प्रभावी काम करीत होते.

शिक्षण हाच त्यांचा ध्यास होता.त्यांचा सारा प्रवास म्हणजे एका दिशेचा शोध होता..माणूस निर्मितीचा ध्यास होता..अंखड प्रवास संशोधन, उत्तम अभ्यासात त्यांनी गुंतून घेतले होते. पण त्यांना कधीच प्रसिध्दी मिळाली नाही.त्याची त्यांना खंतही नव्हती.ते कधी पुरस्काराच्या आणि प्रसारमाध्यमांच्या पानावर चमकले नाहीत. केवल कर्तव्याची भावना आणि जबाबदारीची जाणीव त्यांना होती. मात्र जेव्हा अंगी काही नसलेले आणि देखावे करणारी माणंस मात्र चमकत होती..त्यांची त्यांना अधूनमधून खंत वाटायची.

एक दिवस त्यांनी ठरविले चांगले काम करून आपल्याला समाजात स्थान नसेल तर वाईट काम करूया आणि माध्यमांच्या पानांवर स्थान मिळूया. ..म्हणून ते बायकोची अनुमती घेऊन घराच्या बाहेर पडले. जिल्हयाच्या ठिकाणी जातात . तेथे पोलिस स्टेशन गाठतात..कोणतीही भिडभाड न ठेवता सरळ स्थानकात गेले आणि समोर बसलेल्या साहेबांच्या श्रीमुखात भडकावली..साहेब तात्काळ उभे राहिले. गुरूजींना वाकून नमस्कार करीत त्यांनी शिपायला कॉपी आणण्यास सांगितले. तेव्हा साहेब म्हणाले “ गुरूजी तुम्ही पेरलेले संस्कार हा जीवनाचा ठेवा आहे.तुम्ही जे पेरले ते उगवले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. पण गुरूजी तुमचे संस्कार कधीच विसरणार नाहीत ”.

गुरूजीनी कॉपी घेतली आणि निराश मनाने बाहेर पडले. पुढे आता काय करायचे असा विचार सुरू होता...अखेर काही करून प्रसिध्दी हवी होती. त्यामुळे प्रसिध्दीसाठी त्यांनी रस्त्यांने जाणा-या एका मुलीचा हात पकडला...आणि त्या पुढे जाणा-या मुलीने मागे वळून पाहिले..तर आपले गुरूजी..भर रस्त्यात तीने वाकून नमस्कार केला..आणि ती म्हणाली “ गुरूजी आजच जिल्हयाची जिल्हाधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी आले आहे. तत्पूर्वी शहर फिरून पाहावे म्हणून पायी फिरत होते..आले तेव्हाच तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. मी तुम्हाला भेटण्यासाठी गावी येणार होते. पण देवाने माझी विनंती ऐकली आणि तुम्हालाच माझे पर्यत पाठविले. आता माझ्या सोबत घरी चला..”

गुरूजी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावरती आले..जिल्हाधिकारी बाईंनी गुरूजींना स्वतःच्या हातांने तयार केलेले जेवन जेऊ घातले आणि लाल दिव्याच्या गाडीत घरी पोहचविले.घरी आलेल्यानंतर बायकोने विचारले मग काय मिळाली का प्रसिध्दी.. ? तर गुरूजी निराश मनाने म्हणाले, “ नाही..मी वाईट करूनही त्यातून चांगलेच उगवले ” तेव्हा बायको म्हणाली “ चांगले गुरूजी हे प्रसिध्दीसाठी माध्यमांच्या पानापानावर नसतात , तर ते विद्यार्थ्यांच्या हदयावर असतात.चांगले शिक्षक जोवर विद्यार्थी जीवंत असतात तोवर ते जीवंत असतात ”.

चांगल्या शिक्षकांसाठी शाळा, महाविद्यालय ओळखली जात होती. चांगले शिक्षक हेच शिक्षण संस्थाचे भूषण असते. कारण ते जे काही पेरणार असतात आणि त्यातून समाजासाठी जे काही उगवणार असते त्यावर शिक्षण संस्थाचा ब्रॅंड ठरलेला असतो. मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणांच्या होणा-या जाहिराती पाहिल्या, की शिक्षणातून काय हरवत चालले आहे हे सहजपण लक्षात येते.

शाळा,महाविद्यालयात चांगल्या शिक्षकांच्या जागा या भौतिक सुविधा कधीच घेऊ शकणार नाहीत..पण माणंस जेव्हा हददपार होत जातील तेव्हा आपण बरेच काही गमवलेले असेल..शाळा म्हणजे जीवंत माणंस आणि त्यांची नैतिकतेची पाऊलवाट चालणे असते.केवळ सिमेंटची जंगले आणि डांबरी रस्त्यांनी सजलेले आणि विचाराचा गंध नसलेली हिरवळ म्हणजे शिक्षण नाही हे लक्षात घ्यायला हवे.

प्रामाणिकपणे पेरणी करणारे शिक्षक..मूल्यांची धारणा जपणारी माणंस आणि समाज व राष्ट्रासाठी आपला प्रवास सुरू ठेवणारी माणंस..आत्मसन्मान जोपासणारी आणि ध्येयासाठी चालत राहाणारी माणंस म्हणजे शाळा असते..अन्यथा शाळेची “ शाळा ” करणारी माणंस वाढू लागली , की शाळांना जाहिरातीची गरज भासू लागते आणि तीही मुक्या भिंतीची आणि शिक्षणाशिवाय उरलेल्या सुविधांची...समाजाने ठरवायला हवे आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे..

*-संदीप वाकचौरे*

(लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहे.)

आजच्या महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीमध्ये Sujata Patil यांचा "शाळा उघडली तरीही... " हा लेख प्रसिद्ध झाला आहे. वेळ काढून नक्की वाचा.

आजच्या महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीमध्ये Sujata Patil यांचा "शाळा उघडली तरीही... " 
हा लेख प्रसिद्ध झाला आहे. वेळ काढून नक्की वाचा.

शाळा उघडली तरीही...  

करोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरित्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला . या एवढ्याश्या विषाणूनी आधुनिक विज्ञानालाही संभ्रमात पाडलं. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. या संकटाने शिक्षण क्षेत्राला तर समूळ  हादरा बसला. 
मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या आणि वर्गातल्या प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय म्हणून ऑनलाइन/ डिजिटल शिक्षणाचा पर्याय पुढे आला. काही शिक्षक थोड्याफार प्रमाणात शालेय अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल कन्टेन्ट चा वापर यापूर्वी करत होते. पण सगळीच प्रक्रिया ऑनलाईन झाल्यावर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं याचं प्रशिक्षण शिक्षकांना नाही आणि ऑनलाईन शिक्षण कसं घ्यायचं याचं तंत्र विद्यार्थ्यांना माहिती नाही , अशा परिस्थितीत हे शिक्षण सुरू झालं .ऑनलाइन शिक्षणाचे काही थोडे फायदे आणि असंख्य तोटे यावर अनेक चर्चा झाल्या आहेतच हे ऑनलाईन शिक्षण फार कमी विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं ही वस्तुस्थिती आहे. या काळात वृत्तवाहिन्या ,वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या ऐकायला वाचायला मिळाल्या होत्या........
तेरा वर्षांचा मुलगा भाजी विकून मोबाईल घेण्यासाठी पैसे साठवतो आहे.
शाळेचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल नाही म्हणून शाळकरी मुलीची आत्महत्या.
आईने मंगळसूत्र विकून मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन घेतला.
अभ्यासाला मोबाईल दिला नाही म्हणून दोन भावंडांमध्ये मारामारी..
...... या आहेत गेल्या चार- सहा महिन्यातल्या काही मन विषण्ण करणाऱ्या बातम्या.
  बारा-तेरा वर्षाच्या मुलाला ,मुलीला जर स्वतःच्या शिक्षणासाठी मोबाईल घेण्यासाठी अशी कामं करावी लागत असतील तर ती कौतुकाची गोष्ट नक्कीच नाही. तो आपल्या व्यवस्थेचा पराभव आहे ,ती बालमजुरी आहे. ज्या व्यवस्थेने सगळ्या मुलांकडे स्मार्टफोन असतीलच असं गृहीत धरलं त्या व्यवस्थेची ती चूक आहे .त्या एका मोबाईल फोन नसल्याची व्यथा काही कोवळ्या जीवांचा बळी घेऊन गेली हे तर अजुन वेदनादायी. 
  मुलांच्या शरीर आणि मनावर मोबाईल व संगणकाच्या अतिवापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात ,मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवायला हवा, अशा चर्चा सात- आठ महिने आधीपर्यंत चालू होत्या. आणि मग अचानक शाळाच ऑनलाईन भरायला लागली. शिशुवर्गातल्या मुलांची सुद्धा तीन-चार तास ऑनलाईन शाळा सुरू झाली .मोठ्या वर्गातल्या मुलांची पाच-सहा तास ऑनलाईन शाळा. मुलांचा वयोगट, त्यांचा एकाग्रतेचा कालावधी (अटेंशन स्पॅन), त्यांची मानसिकता या सगळ्याचा फार कमी विचार या प्रक्रियेत केला गेला आहे. शिक्षकांपुढे सुद्धा असंख्य अडचणी आहेत. वर्गात समोरासमोर शिकवण्याची, संवाद साधण्याची सवय असलेले शिक्षक या नव्या माध्यमाला सरावलेले नाहीत. त्यामुळे त्यांचीही तारांबळ उडाली.मग मुलांच्या सोबत या ऑनलाईन वर्गाना उपस्थिती लावणाऱ्या अतिउत्साही पालकांनी शिक्षकांवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक शिक्षकांचंही मनोधैर्य खच्ची झालं.
मुळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ही संवादी प्रक्रिया आहे .शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया, विद्यार्थ्यांचा आपापसातील संवाद यातून शिक्षण घडते. वर्गात समोर असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात ,चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रतिक्रियांवरून त्यांना शिकवत असलेल्या विषयाचं किती आकलन होत आहे ; ते शिक्षकाला समजत असतं .त्यावरुन कोणता मुद्दा पुन्हा समजावून सांगण्याची गरज आहे, कुठे मुलांना पूर्ण समजले आहे, कुठे थांबण्याची गरज आहे हे शिक्षकांना कळत असते ."प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते" ,हे शिक्षणशास्त्रातील महत्त्वाचं तत्त्व आहे.  ऑनलाइन शिक्षणात तेच तत्त्व बाजूला पडतं. सगळ्यांना एकाच तराजूत मोजताना एकाच गतीने शिकवणं चालू राहतं .शिक्षण किती चालू आहे,  खरं तर चालू आहे का याचा पत्ताच लागत नाही.
या ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले समजत नाही, शंका ,समस्या विचारायला अवकाशच नसतो ही तक्रार अनेक मुले करतात .जी मुले त्या ऑनलाइन शिकवण्याच्या वेगाने जाऊ शकत नाहीत त्यांच्या मनात शिकण्याबद्दल नावड किंवा न्यूनगंड तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुलांच्या सतत ऑनलाईन असण्यातील धोक्यांबद्दल जगभरातले मानसशास्त्रज्ञ ,शिक्षणअभ्यासक बालरोगतज्ज्ञ अत्यंत गंभीरपणे विचार करीत आहेत, त्यातले धोके मांडत आहेत. इंटरनेटवरचा मुलांचा वावर आणि त्यातले धोके हा अनेक समाज अभ्यासकांच्या चिंतेचा विषय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी मुलांची फसवणूक, त्यांना दमदाटी करून करवून घेतली जाणारी गैरकृत्ये,लैंगिक अत्याचार या सगळ्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याचे भयंकर परिणाम मुलांना पालकांना आणि समाजाला भोगावे लागतील. अश्या अनुभवांना सामोरं जावं लागलं तर त्याचे मुलांवर होणारे भावनिक , मानसिक परिणाम त्यांचं आयुष्य उध्वस्त करणारे असू शकतात.
मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीन कडे सतत बघून डोळे दुखणे ,लहान वयातच चष्मा लागणे, चंचलता,मानसिक, शारीरिक अस्थैर्य, सतत एकाच जागी बसून राहणं, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे स्थूलता ,ग्रहणशक्ती कमी होणे असे कितीतरी दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. मुलांचं आपापसात खेळणे ,भांडणे ,एकत्र डबा खाणे,  एकत्र नव्या गोष्टी शिकणे, शाळेतले विविध उपक्रम, शिक्षकांशी गप्पा या त्यांच्या भावविश्वातील  खास गोष्टी आहेत आणि त्या त्यांना मिळायलाच हव्यात.
अर्थात हे सगळं ज्यांना ऑनलाईन शिक्षण आणि त्यासाठीच्या सुविधा परवडतात त्यांच्यासाठी आहे. करोनाच्या या भयंकर काळात लाखो कुटुंबं देशोधडीला लागली आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या, कामधंदे बंद झाले आहेत. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ,अशावेळी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठीच्या सुविधा आई-वडील कुठून आणणार ? 
ज्या मुलांना या सगळ्या अद्ययावत सुविधा मिळत आहेत,  ती मुले शिकत  राहणार, पुढे जाणार . ही वंचित गोरगरीब मुलं मात्र मागे पडत राहणार. म्हणजे या ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच अस्तित्वात असलेली सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक दरी अजून रूंदावत जाणार .आहे रे आणि नाही रे मधला भेद आणखी तीव्र होत जाणार. एक अजून नवीन ' वर्गव्यवस्था' निर्माण होणार ! "सर्वांसाठी समान शिक्षण" या शिक्षण हक्क कायद्यातील महत्त्वाच्या तत्वाची ही पायमल्ली आहे. 
आणि अगदी नेमकं हेच वास्तव आता ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्यावर समोर येते आहे .बराच विचारविनिमय होऊन, या निर्णयावर उलटसुलट चर्चा होऊन अखेर 23 नोव्हेंबरला शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या.  सगळ्या शाळा सुरू झालेल्या नाहीतच .काही शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
खरंतर करोनाचे संकट अजूनही पूर्णपणे नष्ट झालेले नाही. आपण सगळेच लस येण्याच्या प्रतिक्षेत आहोत .अशा वेळी शाळा सुरू करण्याची घाई करू नये ,असे अनेक पालक शिक्षक यांना वाटते आहे .त्यात गैर काहीच नाही . कारण दुर्दैवाने काही दुर्घटना झालीच तर त्याचे परिणाम शेवटी शाळा व्यवस्थापन , मुख्याध्यापक , शिक्षक यांना भोगावे लागतील. 
तरीही आम्ही 23 तारखेपासून शाळा सुरू केली. नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले. धोका आहेच याची कल्पना आहे, पण सध्या तरी परिस्थिती नॉर्मल आहे, त्याचा फायदा करून घ्यावा असं आम्हा सर्व शिक्षकांचं मत आहे. धोका शाळा सुरू न करण्यात पण आहे. नववी, दहावी मधली काही मुलं या काळात दुकानांमध्ये कामाला लागली. मुलांना आणि पालकांना या पैश्यांची चटक लागली तर मुलं परत शाळेकडे वळणं अवघड होईल. आमच्या शाळेतल्या दोन मुलींचं शिक्षण पालक थांबवतील की काय अशी भीती आहे. एका मुलीला वृद्ध आजोबांची देखभाल करायला गावी पाठवून दिलंय. दुसरी एक दहावी मधली अतिशय हुशार, चुणचुणीत मुलगी . तिला शाळेत पाठवायला तिची आई टाळाटाळ करतेय हे लक्षात येत होतं. तिची आई वह्या,पुस्तकांना पैसे नाहीत ही सबब सांगतेय , पण  तिला शाळेकडून वह्या पुस्तकं देऊ हे सांगूनही सुरुवातीला त्या मुलीला शाळेत पाठवलं नाही. आणि ही परिस्थिती देशात सार्वत्रिक असणार आहे. सध्या तरी हा धोका निवडायचा की तो धोका निवडायचा हाच गहन पेच आहे !
शाळा सुरू झाल्यावर जेव्हा या मुलांशी प्रत्यक्ष संवाद व्हायला लागला तेव्हा या काळात मुलांनी काय काय सोसले ते कळते आहे.  ज्या मुलीला आई शाळेत पाठवत नव्हती ,ती  मुलगी शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेत यायला लागली. ती सांगत होती,  "मॅडम , माझी आई शाळेत पाठवतच नव्हती. या सगळ्या मुली पहिल्या दिवशी शाळेत आल्या ना तेव्हा मी खूप रडले. वाटलं माझं शिक्षण संपलं आता .आई म्हणत होती आता काय चार महिने राहिलेत ,आता कशाला जायचं शाळेत?  कालपासून शाळेत यायला लागले ना, तर फार आनंद वाटतोय. 
किती काय काय साठलेलं आहे मुलांच्या मनात , त्यांना अजुन ते पूर्ण व्यक्त सुद्धा करता येत नाहीये! 
"घरी खूप प्रॉब्लेम झाले मॅडम, पप्पांचं काम बंद झालं .खायचे-प्यायचे वांधे झाले होते."
"बाबांना कर्ज काढावं लागलं,  अजूनही काम सुरू झालं नाहीये त्यामुळे कर्ज फेडता येत नाही".
"घरात पैसे नव्हतं .आई वडील खूप चिडचिड करायचे .सारखे' पैसे नाहीत, पैसे नाहीत' हाच विषय असायचा.
"सगळ्या वस्तू खूप महाग मिळायच्या काही परवडायचं नाही".
"रेशन दुकानातून, काही संस्थांकडून धान्य वगैरे मिळालं, पण आपण आणतो ते वेगळेच वाटतं ना, मॅडम?"
"मला तर सारखी भीती वाटायची आता शाळा कधी सुरू होतील की नाही?"
"आधी शाळेत अभ्यासाकडे लक्ष नाही द्यायचो मी ,पण आता कळलं की अभ्यास करायला पाहिजे"
"शाळेची खुप आठवण यायची, मॅडम" 
"आमच्याकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे काहीच अभ्यास कळायचा नाही ,मग वाटायचं आम्ही गरीब आहोत म्हणून आता आम्हाला शिक्षणच मिळणार नाही का? " 
हे सगळं ऐकताना कित्येकदा आवंढा गिळावा लागला. तोंडावर मास्क असल्याचा अजून एक फायदा कळला !  या आमच्या मुलांना शाळा सुरू झाली याचा मनापासून आनंद झाला आहे आणि असा आनंद अनेक मुलांना झाला असणार याची खात्री आहे. 
अर्थात शाळा सुरू करताना मनात प्रचंड धास्ती आहे. मुलांची सुरक्षितता, शिक्षकांचे स्वतःचे तब्येतीचे प्रश्न आहेतच.करोनाच्या येऊ घातलेल्या  दुसऱ्या लाटेचा धोका आहेच, त्यात शासनाने स्थानिक व्यवस्थापन ,मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी ढकलून दिली आहे.
यानिमित्ताने आपल्या शिक्षण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी लक्षात आल्या आहेत आणि सगळी शिक्षण व्यवस्था नव्याने उभी करून त्यात लवचिकता आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवली आहे.
सध्यातरी लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लस यावी आणि प्रत्येक विद्यार्थी ,शिक्षकांपर्यंत ती पोहोचून पुन्हा शाळा निर्धोकपणे सुरू व्हाव्यात  ही सदिच्छा व्यक्त करण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही. 
........सुजाता पाटील.

Monday, November 9, 2020

आदिवासी बहुल क्षेत्रात विकासाची सक्षम पाउले ! : हेमलताताई पिचड यांची वेगळी ओळख .

💥 आदिवासी बहुल क्षेत्रात विकासाची सक्षम पाउले !  : हेमलताताई पिचड यांची वेगळी ओळख .
    ------------------------------------ 🌾🌾

    🗒 अकोले, ता.९: 

   गावखेड्यातील परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या पूज्य महात्मा गांधींनी भारतातील ग्रामीण भागाच्या उत्थानावर अधिक भर दिला होता हे आपण जाणतोच . तथापि आदिवासी बहुल दुर्गम ग्रामीण भाग सातत्याने दुर्लक्षित राहिला . अनेक सुधारकांसह स्री शक्तीने खेड्यातील सुधारणांच्या वाटेवर मोलाची कामगिरी स्वातंत्र्योत्तर काळात केल्याचे दिसेल . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका देखील अग्रणी राहिला आहे . 

     आदिवासी , उपेक्षित , महिला यांना आधार देतानाच शिक्षण ,आरोग्य,पर्यावरण,वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धन , ग्रामविकास, बचत गट, गाव दत्तक योजना, आदर्श गाव , आदर्श सरपंच असे विविध उपक्रम प्रत्यक्षात आणून माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सुविद्य पत्नी सौ . हेमलता ताई  पिचड सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत . या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना कृषी मित्र पुरस्कार व इतर सामाजिक संस्थांनी आजतागायत  २४ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .  तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील संस्थेने मदर तेरेसा अवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .

    सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी महिलांकरिता  मार्गदर्शनाची गरज ओळखून महिलांचे समुपदेशन महत्वाचे मानून आदिवासी समाजात व विशेषतः महिलांध्ये रुढ असलेली केवळ ' चूल व मूल ' ही मर्यादित जाणीव न ठेवता याबाबतीत परिवर्तन घडविण्यासाठी सौ .हेमलता पिचड यांनी भरीव काम केले . समाज व्यसनाने ग्रासला असून त्याला व्यसन मुक्त करण्यासाठी दारूबंदीची चळवळ त्यांनी उभारली . पंधरा हजार लोकवस्तीचे राजूर गाव दारू मुक्त करतानाच इतर १४० गावांत दारू बंदीचा ठराव करून इतिहास घडविला आहे , तर पर्यावरण टिकून  राहण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गावागावात पोहचवून ' झाडे लावा झाडे जगवा ' हा कृतीशील मंत्र तालुक्यात पोहचवून कोल्हार घोटी रस्त्यावर सुमारे चाळीस हजार वृक्ष लागवड करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष साखळी तयार केली .

     तालुक्यात कुपोषण होऊ नये म्हणून  महिला ,बालक ,वृध्द यांच्यासाठी आरोग्य शिबिरे  भरवून आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे .  गेली नऊ वर्षे राजूर गावच्या आदर्श सरपंच म्हणून कार्य करताना रस्ते,पाणी योजना,शेतीला पाणी,वीज यांचे योग्य नियोजन करून कार्य केल्याने दिल्ली येथे राज्यपाल यांचे हस्ते त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार प्राप्त झाला .तर प.पू.गगनगिरी महाराज यांना गुरूस्थानी मानून त्यांच्या नावे सामाजिक संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत गगनगिरी हॉस्पिटल सुरु केले .   राजूर परिसरातील  मंदिरांना आर्थिक मदत देऊन अध्यात्मिक कार्य केले राजूर येथे ह .भ .प . ढोक महाराज यांचे मार्फत रामायण कथेचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित होते .रंधा फॉल येथील घोरपडा देवी मंदिराचा जीर्णोद्धार,श्री स्वामी समर्थ मंदिर,श्री अगस्ती मंदिर,सोमनाथ देवस्थान,रतनवाडी अमृतेश्वर मंदिर,वाल्मिकी आश्रम,यांचे नियोजन करून राजूर येथील देवस्थानचे जीर्णोद्धार,स्वामी गगनगिरी महाराज या मंदिरांसह  गेली ३०वर्षांपासून श्री दत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ते करतात .

      एकलव्य एज्युकेशन संस्थे मार्फत आदिवासी मुलामुलींना संगणक शिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत . मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र मुलींची शाळा ,आश्रमशाळा निर्मिती केली . २०११ ला राजूर गावच्या बिनविरोध सरपंच झाल्या  त्या वेळी राजूर गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता .महिलांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असे . पाण्याची टंचाई असल्यामुळे राजूर गावात मुली देण्यास कुणी धजावत नव्हते , मात्र माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पाणी योजनेसाठी भरीव निधी देऊन या योजनेचा जीर्णोद्धार झाला आहे .  नवीन मोटारी पाईप लाईन याचे नियोजन झाले आणि गावाला रोज पाणी मिळू लागले . एक कोटी वीज बिलाची रक्कम उभारून ती भरून दरवेळेस वीज बिलामुळे पाणी योजना बंद पाडण्याचे संकट दूर केले . राजूर गावचे रस्ते,गटारी,ग्राम सचिवालय,वीज इत्यादी प्रश्न त्यांच्या कार्यकाळात सुटले ,राजूर गावच्या विकासाबरोबर गोंदूशी गाव दत्तक घेऊन या गावात पिण्याच्या पाणी बरोबरच शेतीला पाणी ,मिळण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करून बंधारा बांधून पाणी अडविले . त्यातून गावाला नळाद्वारे पाणी मिळालेच परंतु ज्या शेतात भात सोडून आदिवासी शेतकरी पीक घेत नव्हते त्या शेतात आज भाजीपाला , ऊस बांधावर फळबाग उभी राहिली आहे .आरोग्य वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.,गाव हागणदारी मुक्त झाल्याने निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळाला आहे .त्यामुळे सामाजिक कामाची दखल घेऊन मुंबई,दिल्ली,नाशिक,नगर,पुणे ,राजूर येथील सामाजिक संस्थांनी त्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले .

     आदिवासी भागातील दूध धंदा वाढवून आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून बचत गटांची स्थापना केली तारामती महिला दूध संस्था स्थापन करून महिलांना दुभती जनावरे उपलब्ध करून देऊन हे दूध अमृत सागर दूध संस्थे मार्फत मुंबईला पाठवून त्यातून महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले .स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान ,राजूर ग्राम पंचायत, भारतीय महिला मानवाधिकार महिला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद तसेच गगनगिरी महाराज यांच्या त्या निस्सीम भाविक असून तालुक्यात त्यांनी शिक्षण ,आरोग्य,ग्रामविकास,अध्यत्मिक केंद्र,व्यासांमुकती चलवळ उभारून महिलांना आधार देण्याचे काम केले त्यांच्या या कामाला लोक मान्यता मिळाली दारूबंदीसाठी मंत्रालय, उच्च न्यायालय ,जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस यांचेकडे पाठपुरावा करून राजूर येथे सात दुकाने बंद करून कायमस्वरूपी दारूबंदी केली ,चाळीस हजार वृक्ष लागवड व.सवार्धन केले महिलांच्या आरोग्यासाठी व कुपोषण दूर होण्यासाठी आरोग्य केंद्र स्थापन केले तर सरपंच पदाच्या माध्यमातून गाव विकासात सहभाग घेऊन आदर्श गाव संकल्प योजना यशस्वी केल्याने त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेऊन '  हुज हू ' इन अमेरिका या बुक्स मध्ये दखल घेण्यात आली . दिल्ली येथे माजी राज्यपाल शिवराज पाटील यांच्या हस्ते आदर्श सरपंच म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला .कृषी मित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार दिला , व्य सन मुक्तीचा पुरस्कार एक ना २४पुरस्कार त्यांना मिळाले व नुकताच मदर तेरेसा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे .

    माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासाची कामे करताना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राचा अवलंब करून  ७५ वर्षे असलेल्या वयात त्या तरुणांना लाजवेल अशा प्रकारे   सकारात्मक कामाचा प्रवास करीत आहेत .
     विकासाच्या वैविध्यपूर्ण वाटा सौ . हेमलता ताई पिचड यांनी राजूरसह अकोले तालुक्यातील दुर्गम वाड्यापाड्यां पर्यंत पोचविल्या आहेत . विशेषतः व्यसनमुक्ती आणि संस्कार केंद्रांच्या रुपात ही जागृतीची सक्षम पावले तोलामोलाच्या रुपात पडलीत . 
    ------------------------------------------ 

   🍂🍂🍂

Friday, August 7, 2020

राणभाजी

*कळसुबाई हरिश्चंद्रगड,रतनगड परिसरातील रानभाज्या*
 पावसाळ्यात पाऊस पडला की रोहीणीच्या येळेला मातीतुन कितीकं रानवेलींच जीवन उमलुन वर येते.
काही झाडाझुडपांची तर काही वेलींची पानं, फुलं,खोड, मुळ, देठ, कोंब खाले जाते.
आणि ह्या सगळा आपलेली नैसर्गिकपणे आणि कोणत्याही खताशिवाय आणि बी पेरावे लागत नसल्याने किंवा कोणतीही मेहनत करावी लागत नाही.
उदा-चाईचा देट,चाईचामोहर,करटुली,गोमेटी,गुळवेल,आंबटवेल,कुरडू,तेराआळवड,टाकळ्याची पानं दिव्याची भाजी,बडद्याची भाजी,कोळुचीभाजी,फांदेची भाजी भोकरीच्या पानांची भाजी शिवाय कवळ्या बोखांची भाजी,लोतीची भाजी,घायपाताच्या फुलांची भाजी,बहाव्याच्या फुलांची भाजी,आघाड्याच्या पानांची भाजी,आणवा,करंजकंदाची भाजी,पंधाचेकंद,सुरणकंद,कवदरची भाजी,खरपुडी,सायरीच्या सायरधोड्याची भाजी,वाघाटीची भाजी,कच्च्या आणि कवळ्या आळवांचीभाजी,(कच्या करवंदाची चवदार कढी,चटणी,कच्च्या करवंदांचे लोणचं जंगली आणि गावरान आंब्याचे लोणचं,भोकरीच्या कवळ्या पानांचे मुटके,फळांची भाजी,मोहट्यांच्या फळांची भाजी,मोहाच्या फुलांची खीर,पुरणात हलकासा वापर) चिलाचीभाजी,काटमाठाची,तांदुळणेची,कोंबडेचीभाजी(अशा फक्त रानभाज्यांची यादी 100पेक्षा जास्त होईल)या रानभाज्यावर कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही किंवा खत औषध लागत नाही.हे आपल्याला नैसर्गिक रित्या रानावनात शेताच्या बांधावर तीनही ऋतुत मिळत असल्याने यासचं सेंद्रीय शेती असे म्हणता येईल.
बऱ्याच ठिकाणी काही मान्यवर(शेतीतज्ञ)प्रश्न विचारतात की तुम्ही आजिबातही खत औषध वापरत नाही हे खरे आहे काय? तेव्हा ममताबाई किंवा आम्ही महिला हसत हसत सांगतो की करवंदाच्या जाळी किंवा मोहाच्या,भोकराच्या झाडाला कस खत घालणार ते तर जंगलात आपोआपच वाडते.आणि पुढे सांगाव लागत की "जर तुम्ही किंवा आम्ही या रानमेव्याची विशेषता जंगली रानवेलींची,रानकंदांची छेडछाड केली किंवा त्यांच्या बिया लावण्याचा प्रयत्न केला तर त्या रुजणार नाहीत आणि रुजल्यानंतर रासायनिकखत दिले तर त्या अपेक्षित उत्पन्न देणार नाहीत.ते जंगलात वाढतात त्यांना जंगलातच वाढू द्या,म्हणुन आमी आदिवासी लोकं ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक असेल तेवडेच घेतो फार तर एखाद्या वेलीची ठराविक वेळी आणि ठराविक काळातच भाजी खाल्ली जाते,तीही एकदोन वेळसच.
जसे-बडदा,दिवा ही भाजी कोवळी पानं असतांनाच खाल्ली जाते.टाकळा(तरोटा)ही भाजी उगवल्यानंतर आट दिवसाच्या आतच खाण्याजोगी असते.तसेच चाईचा देट पानावर येण्या अगोदरच खाण्या योग्य असतो.
 जंगलात ठराविक काळात मिळणाऱ्या रानभाज्यांचे कंदवर्गीय,वेलवर्गीय,झुडुपवर्गीय,झाडवर्गीय,फळवर्गीय असे प्रकार आहेत.
रानातील सगळ्याच बिनखताच्या रानभाज्या अगुदर पाण्यात शिजवून(उमवून)घेतल्या जातात नंतर पिळुन भाजी करतात.कारण ह्या बहुतेक रानभाज्या पचनास जड असतात.ह्या रानभाज्या खुरासणेच्या थोडेश्या तेलातही चवदार लागतात.
आमच्या जेवनात अजूनही खुरासण्याच्या/शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो.
वाढत्या शहरीकरणामुळं रानातील हा रानमेवा अतिदुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे,म्हणुनच या रानमेव्याची/रानभाज्यांची चव चाखण्या बरोबरच त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही स्वतःपासुन सुरुवात केली आहे.आम्ही कळसुबाई परिसरातील महीलांनी बायफसंस्थेच्या सहकार्याने परसबागेची चळवळ सुरु केली आहे.त्या परसबागेची दखल बायफसंस्थेने घेऊन परसबागेच्या चळवळीतील महिलांचे काम राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे.
माझ्या सासुबाईं व ममताबाई भांगरे ह्यांचे बालपण माहेर,सासर ग्रामिण भागात बाडगीच्या माची परिसरातील निसर्ग संपन्न आणिआदिवासी बहुल भागात राहिल्याने येथील निसर्गातील वनसंपदेची अचूक माहिती सांगतात.
भविष्यात पुढील पिढीला ह्या रानमेव्याची विसरपडू नये यासाठी आम्ही सासू सुना जुजबी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
जय राघोजी
जुजबी शब्दांकन -सौ.जिजाबाई मधुकर भांगरे.
रानभाज्या संकलक-सौ. ममताबाई भांगरे 
देवगाव ता.अकोले जि अहमदनगर.सशांताराम बापू काळे

Tuesday, August 4, 2020

बापू एक संघर्षमय जीवन

संघर्षातून यशस्वीतेकडे वाटचाल करणारा अवलिया-  शांताराम काळे

काही व्यक्ती संघर्ष करण्यासाठीच जन्म घेतात की काय ? असा प्रश्न  कधी कधी निर्माण होतो असे असले तरी काही व्यक्ती जिद्द,चिकाटी,परिश्रम व सतत उपक्रमशील राहून यशस्वी होतांनाही दिसतात.असेच एक व्यक्तिमत्व तालुक्यातील आदिवासी भागात राजूर सारख्या गावात आपला संघर्षमय प्रवास सुरु करुन उंच शिखराकडे वाटचाल करीत आहे.त्या आवलीयाचे नाव आहे शांताराम उर्फ बापू काळे होय..
         प्राथमिक,माध्यमिकशिक्षण राजूर येथे सर्वोदय विद्या मंदिर येथे पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अकोले सारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण कष्ट करून पूर्ण केले.पाव बटर विकणे,वृत्तपत्र विकणे,आठवडे बाजारात किराणा मालाचा पाल लावून विक्री करणे ,फोटो स्टुडिओ,मंडप स्पीकरचा व्यवसाय,फळे विक्री असे  छोटे मोठे न लाजता व्यवसाय करून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.1987  या वर्षांपासून विमा विकास अधिकारी उत्तमराव जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले.
        1987 पासून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून गावकरी,सार्वमत,लोकसत्ता ,सकाळ,
महाराष्ट्र टाइम्स व पुन्हा सकाळ अशा नामांकित वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून काम केले.व करीत आहे. विविध क्षेत्रातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली.उपेक्षित,
वंचितांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम श्री.काळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले. प्रामुख्याने  आदिवासी भागातील  अशिक्षितपणा , भौगोलिक परिस्थिती , आरोग्याचे प्रश्न दळणवळणाचे प्रश्न , उदरनिर्वाहाचे प्रश्न  अशा अनेक प्रश्नांना  लेखणीतील ताकदीने  सोडविले.आर्थिक परिस्थितीमुळे  शिक्षणापासून  वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना  यथोचित न्याय , सामाजिक प्रतिष्ठा,  शैक्षणिक सुविधा  मिळवून देण्याचा पुरेपूर यशस्वी प्रयत्न केला. लेखणीच्या माध्यमातून  अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून  त्यांना  त्यांच्या जीवनात  सक्षमपणे  उभे केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थाने पत्रकार समाजाचा आरसा असतो.पत्रकारितेतील आपले कर्तव्य पार पाडून सामाजिक भान जोपासणारे, नगर जिल्ह्यातील अकोले - राजूर येथील शांताराम काळे यांनी विविध सामाजीक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आपली सामाजीक  जबाबदारी पार पाडत आहे.  एक पत्रकार, एक समाज सेवक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्काराने त्यांना माजीमंत्री चंद्रकांतदादा पाटील,माजीमंत्री एकनाथराव खडसे, एबीपी माझाचे संपादक राजीवजी खांडेकर यांनी सन्मानित केले आहे.तसेच तिळवण तेली समाजानेही त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले.
      आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वरील श्रद्धा व विश्वास  असल्याने त्यांच्याच नावाने  1992 साली 
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 30 वर्षे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची जागा,इमारत नसल्याने सहकारी गोडाऊन,म्हशींच्या गोठ्यात  मुलींची शाळा सुरू केली. परंतु अनधिकृत शाळा सुरू केल्याप्रकरणी सदर मुलींची शाळा शासनाने बंद केली.या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मुलींसाठी शाळेची गरज मा.न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने मा.उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. मवेशी येथेही माध्यमिक विद्यालय सुरू केले,त्याच्या मान्यतेसाठीही मा.उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आज राजूर येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  व मवेशी येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय सुरू झाले. व आज स्वतःच्या दिमाखदार इमारतीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात नैपुण्य मिळविले.कालांतराने इंग्लिश मीडियम स्कुल बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. असा शैक्षणिक विस्तार करून आपले शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा करण्यासाठी  रात्रंदिवस ध्यास घेऊन  विविध  अधिकारी, उद्योजक ,प्रतिभावान  महिला यांची व्याख्याने आयोजित करून  विद्यार्थ्यांमध्ये  सकारात्मक प्रेरणा  भरण्याचे काम  अविरत चालू आहे .दरवर्षी 1000 विद्यार्थी शिक्षण घेत असून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून त्यांना शालेय साहित्य,गणवेश व जेवण देण्याचे काम करतात. विद्यार्थी मार्कवंत  होण्याबरोबरच गुणवंत होतीलच या पद्धतीने शाळेचा आराखडा तयार करण्यावर भर असतो.
सामाजिक कार्यात विशेष योगदान असणाऱ्या व मैलाचे दगड ठरलेल्या या व्यक्तिमत्वांचा संस्थेच्या मार्फत दरवर्षी समज "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.यामुळे कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. विद्यार्थी व समाजाला निश्चितच प्रेरणा मिळते . एका पिढीचा  सत्कार्याचा वसा  पुढच्या पिढीला  समजून तो संक्रमित केला जातो. स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ अनिल सहस्रबुद्धे ,प्रा. प्रकाश टाकळकर ,गिरीशजी कुलकर्णी, निसर्ग संगोपीनी हेमलताताई पिचड अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे गौरविण्यात आले आहे.
       कुरकूटवाडी ते त्र्यंम्बकेश्वर पायी दिंडी त्यांचेकडे एक तपापासून (१२वर्षे)येत असून त्यांना भोजन,निवास, व्यवस्था ते करतात असे असले तरी एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि  बापूंच्या मागे प्राचार्या सौ मंजुषा वहिनी अविरत व खंबीर पणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत ,अनेक संकटे आली  मात्र बापू डगमगले नाही त्याचे कारण त्यांच्या सौभाग्यवती होय .सामाजिक बांधलकीतून हे कुटुंब काम करते. दोन मुले इंजिनीअर पदवीधर असून त्यांना कन्या रत्न नसले तरी शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा गणवेश खर्च करतात,त्यांच्या या कार्यास सलाम.
       तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या माध्यमातून ही गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली. राजूर तेली समाजाचे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुका तेली समाज सल्लागार,अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व माजी सचिव, संगमनेर अकोले पत्रकार संघ सदस्य,नगर जिल्हा पत्रकार संघ सदस्य,राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अशा  विविध पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडीत आहे.  
    नगर जिल्ह्यातील समाजातील अग्रगण्य व्यक्तीमत्व असून समाजहित जपणारे   पत्रकार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक समाजसेवक, शिक्षण पंढरीचे वारकरी ,अन्यायाविरुद्ध  वाचा फोडणारा हक्काचा  माणूस, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वाळवंटातही बाग फुलविण्याचे स्वप्न पाहणारे सकारात्मक व्यक्तिमत्व, विधायक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थी हितासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंनी आपली ओळख  निर्माण केली आहे. समाजहितासाठी "कुसुमादपी कोमलानी "तर अन्यायाविरुद्ध "वज्रादपी कठोराणि" या भूमिकेत बापूंनी स्वतःला ढाळून घेतले आहे.
     माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात.
काही चांगले, काही वाईट काही ,कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. 
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले तुम्ही एक..!
म्हणूनच  आपणास
 वाढदिवसानिमित्त  आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday, July 31, 2020

मध मासी

*मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं*

 ते सांगतात कि *मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.

 *हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.*
 मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि *डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र *मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.*

         आपल्यापैकी बहुतेकजण
 हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किलो  मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात.    

आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे.   मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात *साधी बाभूळ, बोर* ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे.  हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, *आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच..*

आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार.
यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो. 
आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो. 
मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एकजण  मित्र झाला होता,  त्याने सध्या पॉली हाऊस करून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात शेती घेतली त्यावेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्षात आलेच नाही. 
आता खरी गंमत अशी आहे की, लॉकडाऊन मध्ये अनेक बिझी मित्र free झाले व त्यांचे फोन आले तसाच त्याचा पण फोन आला की, व तो सांगू लागला पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, म्हणून मी नैसर्गिक शास्वत शेतीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या  आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मग ७ दिवसांनी १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी *शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ* अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे *फक्त स्थानिक झाडेच* शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत.   काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि व  क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच.. अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे. 
*आज कोरोना च्या रूपाने धोक्याची घंटी वाजली आहे वेळीच सुधारणा बदल नाही केला तर मानवी जीवन संपायला वेळ लागणार नाही.
 *फार छान, उपयुक्त, उद्बोधक लेख.*

Sunday, May 31, 2020

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर 
 अकोले 2020-05-30


अकोले , ता. ३०: विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्राप्त लौकिकापलीकडे काही निराळे पैलू असतात . हे पैलू जनमानसात फारसे झोतात नसतात . अपरिचित असतात . असे काही विलक्षण , हटके पैलू नजरेस आल्यास जाणवते ते वेगळेपण . अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ मंत्रीपदाच्या दखलपात्र कार्याने चर्चेत राहिलेले मा . मधुकर पिचड हेदेखील असेच व्यक्तित्व .

राजकारण , सत्ता , आमदारकी , मंत्रीपद , कार्यकर्त्यांचा गोतावळा यापलीकडे मधुकर पिचड यांचा आगळा परिचय ठराविक परिघापलीकडे सुप्त स्वरूपात राहिला आहे , आणि तसा तो परिचय फार थोड्या लोकांना ठाऊक आहे ! असा वेगळा , पूर्णतः भिन्न पैलूंचा मागोवा याठिकाणी नजरेस आणून द्यायचा उद्देश आहे .

मा . पिचड हे , विख्यात तत्वचिंतक , स्वातंत्र्य संग्रामातील थोर सेनानी , ज्येष्ठ समाजवादी , हाडाचे शिक्षक तसेच ' साधना ' साप्ताहिकाचे माजी संपादक दिवंगत प्रा . ग . प्र . प्रधान ( प्रधान मास्तर ) यांचे लाडके विद्यार्थी ! पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रधान मास्तर पिचड यांचे शिक्षक होते . पिचड यांचे वक्तृत्व , धडाडीचे नेतृत्व गुण हेरून प्रधान यांनी स्नेह जपला ! ऐतिहासिक , चरित्रपर , तात्विक आणि चिंतनपर पुस्तकांचे वाचन हे पिचड साहेबांचे वैशिष्ट्य .

समाजकारणासह सर्वच क्षेत्री पिचड यांनी मुत्सद्देगिरी टिकवून ठेवली . माणसांची पारख तसेच सूक्ष्म अभ्यास वृत्ती त्यांच्याकडे आहे . प्रादेशिक क्षेत्राविषयी ससंदर्भ असलेला त्यांचा अभ्यास थक्क करणारा . स्मरणशक्तीची त्यांना असलेली देण ही वेगळी बाब विलक्षणच . पुरोगामी , परिवर्तनशील विचारांचा पिचड यांच्या आयुष्यावर असणारा प्रभाव मोलाचा आहे . छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज , महात्मा जोतीराव फुले - सावित्रीमाय फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , गाडगेबाबा , क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विचारांचा - कार्याचा प्रभाव जसा पिचड यांच्यावर आहे तसाच कृतीशील ध्यासही त्यांना राहिला आहे .

अभ्यासक , संशोधक , साहित्यिक , कलाकार , विद्वत्ता यांविषयी पिचड यांना कायमच आदर राहिला आहे . जिद्द , धैर्य , मेहनत हे त्यांचे सद्गुण ठरलेत . शैक्षणिक क्षेत्राचा आदर ठेवणारे साहेब गुणांची कदर करणारे आहेत . प्रसंगोपात् सडेतोड बाणा , परखड स्वभावाने निर्णयक्षमतेची चुणूक दाखविणारे पिचड आदरयुक्त दबदबा टिकवून राहिले . प्रश्नांच्या चौफेर बाजू समजावून घेऊन चुकीची तडजोड न करता फैसला करायचा पिचड यांचा स्वभाव . आदिवासी , उपेक्षित वर्गातील जनतेच्या समस्यांवर पुरेपूर कागदपत्रे , आधारभूत पुरावे आणि मुळापासून संदर्भीय दुवे मिळवून सातत्यपूर्वक पाठपुरावा करणे हे पिचड यांचे वेगळे वैशिष्ट्य .

सत्य समजल्यावर वैर न करता खिलाडूपणाने परिस्थितीवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हा आहे त्यांचा स्वभाव . क्षमाशील भाव हा कौतुकास्पद पैलू त्यांनी कायमस्वरूपी , सुरुवातीपासून जपला . सकारात्मक विचारसरणी हा आहे त्यांचा स्थायी भाव !

जन्मदिनाच्या स्नेहपूर्वक सदिच्छा ..