Tuesday, July 26, 2011

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ची घोषणा देत सोमवारी राज्यभर शाळांमध्ये घंटानाद करण्यात आला. मुंबईतील अनेक शाळांनी सकाळी अकरा वाजता घंटानाद करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. तर काही संघटनांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन करीत आपल्या प्रश्नांना वाचा फोडली.शिक्षणसेवकांना सन्मानाचे वेतनाचे वेतन, वेतनेतर अनुदान, वीज दरात सवलत, शिक्षकेतरांचा आकृतीबंध आदी मागण्यांसाठी प्रथमच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक एकत्र आले होते. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी पुढाकाराने झालेल्या आंदोलनात मुंबईच्या अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.
विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या होली नेम हायस्कूलच्या भव्य पटांगणात बांधलेली घंटा वाजविण्यासाठी फादर ग्रेगरी लोबो, ‘शिक्षण संस्था मंडळा’चे नेते प. म. राऊत, अविनाश तांबे आदी जमले होते. आर्च डायोसेसच्या १५० शाळांमध्ये असा घंटानाद करण्यात आला. आयईएसच्या ६०, अंजुमन इस्लामच्या ८० शाळा यात सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील बाराशे शाळांमध्ये अशा प्रकारचा घंटानाद करण्यात आल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली.
दरम्यान ‘महाराष्ट्र शिक्षक परिषदे’तर्फे आझाद मैदानात धरणे आंदोलन करून शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. थकीत वेतनेतर अनुदान तातडीने मिळावे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्या, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कायम शब्द वगळलेल्या शाळांचे मुल्यांकन तातडीने करून अनुदान द्यावे आदी मागण्यांवर परिषदेचा जोर आहे. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर आणि आमदार संजय केळकर यांनी आंदोलनकर्त्यां शिक्षकांची भेट घेऊन सरकारदरबारी या मागण्याची तड लावली जाईल, असे आश्वासन दिले.

1 comment: