Monday, June 13, 2011


मोठय़ा तालुक्यांच्या विभाजनाची पूर्वतयारी?Bookmark and SharePrintE-mail
राज्यातील सर्व तालुक्यांच्या माहितीचे संकलन
नगर, १३ जून/प्रतिनिधी

राज्यातील नगरसह काही जिल्ह्य़ांचे विभाजन प्रलंबित असतानाच तालुक्यांच्या विभाजनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व तालुक्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघांच्या अलिकडेच झालेल्या पुनर्रचनेनंतर ही माहिती जमा केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील काही मोठय़ा तालुक्यांचे विभाजन करण्याच्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर ही माहिती मागवण्यात आली असल्याचे समजते.
महसूल विभागाकडून यासंबंधी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले असून सर्व माहिती विशिष्ट नमुन्यात मागवण्यात आली आहे. तातडीने ती द्यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तालुक्याचे सध्याचे मुख्य ठिकाण, त्यानंतरचे मोठे असलेले गाव, तेथील लोकसंख्या, त्याच्या आसपासच्या गावांची नावे, लोकसंख्या, जिल्ह्य़ाच्या मुख्यालयापासून त्या गावाचे अंतर अशी स्वरूपाची ही माहिती आहे. त्याशिवाय संबंधित भागातील शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, रस्ते आदी माहितीचाही यात समावेश आहे.
सर्व तहसीलदारांना अशी माहिती जमा करून पाठवण्याबाबत कळवण्यात आले आहे. राज्यातील काही तालुके आता लोकसंख्येने मोठे झाले असून त्यांचे विभाजन करावे अशी मागणी स्थानिक स्तरावरून सातत्याने होत आहे. काही ठिकाणी जिल्ह्य़ाचेच नव्हे, तर तालुक्याचेही मुख्यालय लांब अंतरावर असल्याने तेथूनही नव्या तालुक्याची मागणी केली जात आहे. नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातून राजूर तालुका निर्माण करावा, अशी मागणी आहे.
भविष्यात असे विभाजन करण्याचा निर्णय झाला, तर संबंधित तालुक्यांची माहिती हाताशी असावी या उद्देशाने सरकारकडून ही माहिती मागवण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान, अलीकडेच राज्यातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. लोकसंख्या, भौगौलिक सलगता, तसेच तालुक्यांचाही आधार घेत ही पुनर्रचना झाली. त्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीनंतर लगेचच आता सरकार तालुक्यांची माहिती मागवत असल्याचे तो चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, या माहितीची जिल्हा विभाजनाशी किंवा विधानसभा मतदारसंघांशी काहीही संबंध नसून महसूल विभागाने त्यांच्या कामकाजासाठी मागवलेली ही माहिती आहे, असे जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.     
बेलवंडीचा विचार शक्य
श्रीगोंदे/वार्ताहर- श्रीगोंदे तहसील कार्यालयात असा प्रस्ताव तयार केला जात आहे. या प्रस्तावात विभाजनानंतर बेलवंडी हे नवीन मुख्यालय दाखवले जाऊ शकते. कारण तेथे पोलीस ठाणे व रेल्वेस्थानक आहे. शिरूर तालुक्यालगतच्या गावांना सोयीचे गाव बेलवंडीच आहे.






हेमलता पिचडांसह १० सदस्यांची निवड निश्चित!Bookmark and SharePrintE-mail
राजूर ग्रामपंचायत बिनविरोधच्या मार्गावर
राजूर, १३ जून/वार्ताहर

राजूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागांवरील बिनविरोध निवडी निश्चित झाल्या आहेत. उर्वरित सात जागांवरील इतर उमेदवारही निर्धारित मुदतीत त्यांचे अर्ज मागे घेण्याची चिन्हे आहेत. प्रभाग चारमधून माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पत्नी हेमलताताई यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने सरपंचपदीही त्यांची निवड निश्चित मानली जाते.
राजूरच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. येत्या दि. २६ ला ही निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा परवा (बुधवार) शेवटचा दिवस आहे. दहा प्रभागांमधील बिनविरोध निवडींची आज निश्चिती झाली. त्यात श्रीमती पिचड यांचा समावेश आहे. सरपंचपद आदिवासी महिलेसाठी आरक्षित असल्याने श्रीमती पिचड यांची निवड निश्चित मानली जाते.
आदिवासी भागातील ४० गाव डांगाणाचे मुख्य केंद्र म्हणून राजूरची ओळख आहे. १५ हजार लोकसंख्येच्या मोठय़ा गावात ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक त्यादृष्टीनेच महत्वाची मानली जाते. श्रीमती पिचड यांच्यासह रेश्मा नवाली, अंजली देशमुख, रोहिणी निघळे, गंगुबाई देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणपत देशमुख, दौलत देशमुख, किशोर कोंडार व सखुबाई पवार अशा दहा सदस्यांचा आज बिनविरोध झालेल्यांमध्ये समावेश आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत उर्वरित सात जागाही बिनविरोध व्हाव्यात यादृष्टीने ग्रामसमितीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीही ग्रामस्थांना तसे आवाहन केले आहे. सर्वसमावेशक असे मंडळ निवडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. युवा नेते वैभव पिचड यांनी उमेदवार निवडताना गुणवत्तेला प्राधान्य दिल्याने समाधान व्यक्त होते.      

Sunday, June 12, 2011


भंडारदऱ्याच्या पाण्यात बुडून रोह्य़ातील अधिकाऱ्याचा मृत्यूBookmark and SharePrintE-mail
राजूर, १२ जून/वार्ताहर
भंडारदरा धरण पाहण्यास आलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रोहा येथील सहायक अधिकाऱ्याचा धरणाच्या पाण्यात पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. प्रशांत वामन गाडगीळ (वय ३५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
येथे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांकडे दिला. येथेच अग्निसंस्कार करून नातेवाईकांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. गाडगीळ यांचा मित्रपरिवार व विमा अधिकारी या वेळी उपस्थित होते. रोहा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गाडगीळ शुक्रवारी धरण पाहण्यास आले होते. हॉटेल अमृतेश्वरमध्ये खोली बुक करून संध्याकाळी नाईट ड्रेसवर धरण परिसरात ते फिरावयास गेले. मात्र, ते रात्री परत आले नाहीत. धरणाच्या कडेला पाण्यात पाय बुडवत असताना तोल जाऊन पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी अकराच्या दरम्यान हॉटेलमधील राजेश राठोड यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांत खबर दिली. सहायक फौजदार कोडम यांनी घटनास्थळी भेट दिली. गाडगीळ यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांचे भाऊ प्रताप गाडगीळ, चनलते, शाखाधिकारी रवींद्र देवधर, कोंडार ढुमणे, केळकर आले शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, मृतदेह नेण्यास १४ तास लागणार असल्याने राजूर येथेच अग्निसंस्कार करण्यात आले. पत्रकार शांताराम काळे, गिरीश बोऱ्हाडे, प्रवीण डेरे, कल्पेश वराडे, देवराम जाधव, नंदकुमार चोथवे, संतोष बंदसोडे यांनी मदत केली. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार तपास करीत आहेत.  

Thursday, June 9, 2011


अकोले, ९ जून/वार्ताहर
वातावरणात निरव शांतता, सुखद गारवा, आकाशातील टिपूर चांदणे, काजव्यांचा चमचमाट अन् मंद शीतल चंद्रप्रकाश.. भंडारदऱ्याच्या आसमंतात सध्या असा अनोखा प्रकाशोत्सव सुरू आहे. रात्रीच्या अंधारात काळ्याशार डांबरी सडकेवरून, रानवाटातून या प्रकाशपर्वात आकाशातील चंद्रकोरीच्या साक्षीने भटकंती करणे हा एक आगळा अनुभव.
पावसाळ्याच्या उंबरठय़ावर, घाटघर-रतनवाडी-भंडारदरा परिसरात दरवर्षीच प्रकाशोत्सव रंगतो. मे महिना संपता संपता या परिसरातील काही झाडांवर काजवे वस्तीला येतात. पाहता पाहता त्यांची संख्या वाढू लागते. काजव्यांच्या वास्तव्याने रात्रीच्या अंधारात भयाण वाटणारी झाडे चैतन्याने जणू मोहरून जातात. लुकलुकत्या काजव्यांमुळे या झाडांचा जणू कायापालट होतो. आकाशातील तारकादळच जसे या झाडावर अवतरल्याचा भास होतो. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अथवा दिवाळीत झाडांवर उघडझाप करणाऱ्या दिव्यांची रोषणाई केली जाते. अशा झाडांची आठवण काजव्यांनी मोहरलेले झाड पाहताना होते. वर्षांराणीच्या आगमनाची वर्दी देणारे हे प्रकाशपर्व मान्सूनच्या आगमनानंतर दोन-तीन पावसांतच लुप्त होते.
भंडारदऱ्यातील काजव्यांचा हा प्रकाशोत्सव सध्या ऐन भरात आहे. कोकणात मान्सून दाखल झाला असला, तरी घाटमाथा ओलांडून तो अजून घाटघर, भंडारदरा परिसरात पोहोचलेला नाही. त्यामुळे रात्री आकाश तसे निरभ्रच असते. मध्यंतरी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने भंडारदऱ्याच्या हवेत सुखद गारवा निर्माण केला आहे. रात्रीच्या अंधारात मंद चंद्रप्रकाशाने सभोवतालच्या जंगलास, डोंगरदऱ्यांना वेगळेच रूप प्राप्त होते. एरवी निरव शांतता जंगलाच्या साक्षीने भयाण वाटू लागते. अशा वेळी केलेला प्रवास अंगावर शहारे आणणारा असतो. पण आता काजव्यांमुळे उजळून निघालेल्या झाडांमुळे तोच प्रवास रोमांचकारी वाटत आहे. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी हौशी व धाडशी निसर्गप्रेमी रात्रीच्या अंधारात भंडारदरा परिसरात भटकंती करीत आहेत. या वर्षी काजव्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्तच असल्याचे या परिसरात नियमित भेट देणाऱ्यांचे निरीक्षण आहे.
भंडारदऱ्याच्या पश्चिमेकडे पांजऱ्यापर्यंत, दक्षिणेला मुतखेल, कोलटेंभ्यापर्यंत, तर उत्तरेला वाकी, बारीपर्यंत केलेल्या भटकंतीत काजव्यांमुळे उजळणारी बरीच झाडे दिसतात. एरवी अशी झाडे शोधण्यासही बरीच भटकंती करावी लागे. पण सध्या डांबरी सडकेवरून पाच-सात मिनिटे चालले तर काजव्यांच्या अशा वस्त्याच दृष्टीस पडतात. कधी बाजूच्या दरीत तर कधी रस्त्याच्या कडेला. निसर्गाचा हा मनोहारी आविष्कार अजून किती दिवस अनुभवण्यास मिळमार ते मान्सूनच्या आगमनावरच अवलंबून आहे.

Monday, June 6, 2011


Print
बिनविरोध निवडणूक, महिला सरपंचपदासाठी प्रथमच प्रयत्न
राजूर, ६ जून/वार्ताहर

अकोले तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक आता प्रथमच बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या बरोबरच गावच्या सरपंचपदाची धुराही पहिल्यांदाच हेमलताताई पिचड यांच्या रूपाने एखाद्या महिलेकडे सोपविण्यात येण्याची चिन्हे आहेत. निवडणूक बिनविरोध व महिला सरपंच या दोन्ही बाबी सर्वपक्षीय सहमतीतून होत असल्याने राजकीयदृष्टय़ा ही महत्त्वाची बाब मानली जाते. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय होऊन ग्रामनिवडणूक समिती स्थापन करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सरपंच व समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी दिली. महिलांच्या ९ जागा व पुरूषांच्या ८ अशा १७ जागांसाठी होत असलेली ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व गावाने एकत्र बैठक घेऊन सहमती दर्शविली. येत्या २६ जूनला ही निवडणूक होत आहे.
गगनगिरीमहाराज प्रतिष्ठान, पत्रकार संघ, तरूण मंडळे, व्यापारी यांच्या पुढाकाराने व गावच्या व्यापक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतानाच आदिवासी, वंजारी, तेली, मागासवर्गीय, शिंपी, सोनार, मारवाडी, मुस्लीम, कुंभार, सुतार यांच्यासह सर्व छोटय़ा-मोठय़ा समाजघटकांना गावच्या कारभारात व निर्णय प्रक्रियेत सामावून घेत विकासाचा नवीन मार्ग शोधणे ही काळाची गरज असल्याचे या संदर्भात सांगण्यात आले. त्या दृष्टीने उद्या (मंगळवारी) सकाळी ९ वाजता ग्रामस्थांनी बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध होत असल्याबद्दल मधुकरराव पिचड यांनी समाधान व्यक्त केले.
राजूर हे गाव ४० गाव डांगाणाचे प्रमुख असून प्रस्तावित तालुका आहे. गावच्या १७पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव असून, यात ५ महिला आदिवासी समाजाच्या, १ अनुसूचित जाती, २ इतर मागासवर्गीय समाज व १ खुला प्रवर्ग असे आरक्षण आहे. आठ जागा पुरूषांच्या असून ४ आदिवासी समाज, तर ३ इतर मागासवर्गीय व १ खुला प्रवर्ग यासाठी आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून सरपंचपद हेमलताताई पिचड यांनी स्वीकारावे, अशी आग्रही मागणी विठ्ठल मंदिरात आयोजित बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी केली. भास्कर येलमामे यांनी प्रास्ताविक केले. विनय सावंत, संतोष मुर्तडक, काशिनाथ भडांगे, संजय मैड, मुरलीधर वाडेकर यांनी या वेळी वरील मतप्रदर्शन केले. आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व्ही. डी. देशमुख, सीताराम देशमुख, गणपत देशमुख, अरूण माळवे, नारायण माळवे, सिंधूताई पाबळकर, शशिकांत ओहरा, सुंदरलाल मेहता, सुनील शहा, पं. स. सभापती मंगल जाधव यांनी पिचड यांच्यामुळे दारूबंदी, तंटामुक्ती होऊन राजूरचा राज्यात लौकिक पसरला. आदर्श गावच्या यादीत राजूर अग्रस्थानी असेल, असे सांगितले.

    Saturday, June 4, 2011


    चैत्यभूमीची राष्ट्रवादीला घाई, बारामतीत मात्र आंबेडकर स्टेडियमचा २० वर्षे खोळंबाPrint
    पुणे, ३ जून / विशेष प्रतिनिधी
    दलित मतांवर डोळा ठेवत दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याचा घाट घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच खुद्द बारामतीमध्ये बांधण्यात येणाऱ्या स्टेडियमला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास प्रथम खळखळ करण्यात आली आणि नावाचा ठराव संमत झाल्यानंतर स्टेडियमचेच काम रखडविण्यात आले थोडीथोडकी नव्हे तर तब्बल वीस वर्षे उलटली, तरी हे स्टेडियम पूर्ण झालेले नाही आता तर तेथे घाणीचेच साम्राज्य पसरले आहे.
    बारामतीमधील माजी नगरसेवक विजय गव्हाणे हे या आंबेडकर स्टेडियमसाठी सातत्याने लढा देत असून, आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासही झालेल्या अक्ष्यम्य विलंबाविरोधात त्यांना आवाज उठवावा लागला होता. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येणाऱ्या या दुर्लक्षामुळे दलित समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. गव्हाणे यांनी ‘लोकसत्ता’ला आपल्या लढय़ाची माहिती कथन केली.
    बारामतीमधील या नियोजित स्टेडियमच्या जागी आधी दलित वस्ती होती. ती स्टेडियमसाठी हटविण्यात आली. १९९१ मध्ये आंबेडकर जन्मशताब्दी असल्याने बांधकाम सुरू झालेल्या स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक गव्हाणे यांनी दिला. मात्र ‘स्टेडियमला पवार यांच्या कुटुंबापैकी एकाचे नाव देण्यात येणार आहे, त्यामुळे असा ठराव देऊ नको, असे  बजावण्यात आल्याचे गव्हाणे यांनी सांगण्यात आले. ‘मात्र तरीही मी ठराव मांडलाच. तर ठरावाला अनुमोदक मिळण्याचीही बोंब होत. ठरावावर सर्वाच्या अखरे सह्य़ा झाल्यावर लागलीच रंगाऱ्याला बोलावून काम चालू असलेल्या स्टेडियमवर आंबेडकर यांचे नाव रंगविण्यास सांगितले. माझी ही कृती सत्ताधाऱ्यांना आवडली नाही आणि त्यानंतर त्याचा राग स्टेडियमच्या कामावर काढण्यात आला. त्यानंतर अद्यापपर्यंत स्टेडियम पूर्णच झालेले नाही. आता तेथे घाण साचली आहे,’ गव्हाणे यांनी उद्विग्नतेने सांगितले.   
    ‘‘या स्टेडियमचे काम चालू असताना बारामतीत इनडोअर स्टेडियम झाले, माळेगावला स्वतंत्र स्टेडियम झाले, मात्र आंबेडकरांच्या नावाचे स्टेडियम अपूर्णच ठेवण्यात आले आहे,’’ याबद्दल गव्हाणे यांनी खेद व्यक्त केला.
    आंबेडकर स्टेडियमप्रमाणेच आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठीही येथील सत्ताधाऱ्यांशी झुंज द्यावी लागली असे सांगून गव्हाणे म्हणाले, ‘माझ्या आधीच्या नगरसेवकांनी आंबेडकर पुतळा बसविण्याचा केलेला ठराव दाबून ठेवण्यात आला होता. मी तो ठराव शोधून काढला आणि तो बसविण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. अखेरीस नाइलाजाने पुतळा समिती नेमण्यात आली, पण त्यातून मला वगळून केवळ पवारसमर्थकांना घेण्यात आले. पुतळा समिती नेमल्यानंतर सगळे थंड झाले. मी उपोषण केले तेव्हा चबुतरा बसविण्याचा ठराव मंजूर झाला, पण त्याची निविदा कोणीच भरली नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागले. पुतळ्यासाठी निधी देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले, पण तो मिळविण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला.’
    पवार कुटुंबाच्या विरोधात गेल्याची राजकीय किंमत आपल्याला मोजावी लागली, असे सांगून गव्हाणे म्हणाले, की १९८४ मध्ये मी प्रथम नगरसेवकपदी निवडून आलो आणि त्यानंतर सलग सहा वेळा मी निवडून आलो. १९९१ मध्ये आंबेडकर स्टेडियमचा ठराव मांडल्यानंतर माझा वॉर्ड राखीव करण्याचा प्रयत्न झाला. तरीही मीजिंकलो. अखेरीस गेल्या निवडणुकीत माझा वॉर्ड संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला आणि अखेरीस मला पाडण्यात आले.

    संक्षिप्त : काजव्यांच्या विश्वात पर्यटक हरखून गेले!Bookmark and SharePrintE-mail
    राजूर, ४ जून/वार्ताहर
    जिल्ह्य़ात बहुतेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले असले, तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तुरळक पाऊस असला, तरी सुट्टीचा आनंद लुटण्यास आलेल्या निसर्गप्रेमी व पर्यटकांनी रात्रीच्या अंधारात चमचमणारी काजव्यांची दुनिया पाहण्यासाठी गर्दी लोटली होती.  रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचे थवे धरण परिसरात, तसेच रंधा, चिचोंडी, भंडारदरा आदी ठिकाणी थांबून होते. पाऊस सुरू झाल्यावर उडणाऱ्या काजव्यांचा लखलखाट अंधारात काही औरच भासत होता. राजूर परिसरात पावसाचे आगमन झाले असून भंडारदरा धरण परिसरात तुरळक पाऊस होता. राजूर भागात मात्र मुसळधार पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. चांगल्या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीची लगबग सुरू केली आहे.